Vikram Rathore with Chief Minister Uddhav Thackeray
Vikram Rathore with Chief Minister Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरच्या रस्त्यांसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. असे असले तरी शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबर महापालिकेची सत्ता उपभोगत आहे. तर दुसरा गट आमदार संग्राम जगताप यांच्याशी हाडवैर ठेवून आहे. यातील दुसऱ्या गटाने अहमदनगर शहरातील रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्याना हे रस्ते दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे.

ही मागणी करताना आमदार जगताप व महापौर रोहिणी शेंडगे त्यांच्या बरोबर नव्हत्या. त्यामुळे अहमदनगर महापालिकेतील महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलने करत आहेत. नगर शहरातील रस्त्याची परिस्थिती सुधारविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे 350 कोटी रुपयांच्या निधीची मागणीचे निवेदन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे हे त्यांच्यासमवेत होते. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी भरीव मोठा निधी दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या शिष्ट मंडळाची उद्धव ठाकरे यांची भेट झाली. नगर शहरातील पक्ष संघटना वाढ आणि शहराचे विविध प्रलंबित प्रश्न, खुंटलेला विकास याबाबत उद्धव ठाकरे यांनी याबाबत नगर शहर शिवसेनेतील युवा वर्गाची मते जाणून घेतली.

शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, शहरातील उखडलेल्या रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे नगरकर या समस्येबाबत नरकयातना भोगत आहेत. शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविणे खूपच अत्यावश्यक आहे. अहमदनगर शहरातील रस्त्याची कामे निधी अभावी रखडलेली असून त्यासाठी 350 कोटी रुपये इतक्या मोठ्या निधीची गरज आहे, अशी मागणी केली.

नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांची जनतेशी घट्ट पकड होती. त्यांच्या विचार आणि कार्यावर आधारित काम करून नगर शहर शिवसेनेतील युवा सदस्यांची पक्ष वाढीस चालना द्यावी, अशी सूचना शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. नगर शहरातील पक्षाचे संघटन कार्य व शहरातील विविध प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा यावेळी झाली.

Chief Minister Uddhav Thackeray along with Abhishek Kalmakar and Yogiraj Gade

Chief Minister Uddhav Thackeray along with Abhishek Kalmakar and Yogiraj Gadeठाकरे म्हणाले, नगर महापालिकेत आपली सत्ता आहे याद्वारे नगर शहराचा मोठा विकास करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सेनेतील युवा वर्गाने पुढाकार घ्यावा. जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी मी जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावेल. पक्ष संघटना बळकट करण्याची आणि सत्तेच्या माध्यमातून नगर शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न , समस्या सोडवून घेण्याची हीच ती वेळ आहे. पक्ष संघटनेत धडाडीने काम करणाऱ्या सेनेतील युवा वर्गाने यासाठी पुढे यावे आणि योगदान द्यावे. शहरात अनिल राठोड यांच्याप्रमाणे सामान्य जनतेचे शिवसेनेशी नाते घट्ट कसे राहील याची जबाबदारी युवा वर्गाने स्वीकारावी अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. शहर विकासाच्या बाबतीत सरकार आग्रही असून नेमकी अडचण सोडवून त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT