<div class="paragraphs"><p>Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale</p></div>

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale

 
design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला : निवडणूक आली की त्यांना नागरीक दिसतात...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठमोठ्या थापा मारतात. यांना विकासाशी काहीही देणंघेणं नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते आणि हे वास्तव जनतेला माहिती आहे, अशी टीका सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून केली आहे.

शाहूपुरीसाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या जलपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते ५ सुवासिनींना जलकुंभ देऊन या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुमारे १० वर्षांपूर्वी दुषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती भगिनीच्या पवित्र स्मृतीस ही योजना समर्पित करण्यात आली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''कण्हेर धरण बांधकामावेळी कै. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेऊन भविष्यात सातारा शहर व परिसरासाठी कण्हेरच्या पाण्याची गरज लागू शकते, यासाठी धरणस्थळी स्वतंत्र तांत्रिक तरतूद केल्यानेच आज एवढ्या सहजासहजी या पाणी योजनेचा लाभ होत आहे. मध्यंतरीच्या काळात दिलीप सोपल पाणी पुरवठा मंत्री असताना ही ३१ कोटींची योजना मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतली होती. सुदैवाने लोकवर्गणीची अट रद्द झाल्याने ही योजना मार्गी लागण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन नंतर लागणारा अतिरिक्त १२ कोटींचा निधी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतला व त्याची फलश्रुती म्हणून आज या योजनेचे पाणी प्रत्यक्षात शाहूपुरीत येऊन दाखल झाले आहे.''

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''विरोधक म्हणत आहेत की कै. भाऊसाहेब महाराजांमुळे २० वर्ष शाहूपुरीस पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. कारण २० वर्षांचा विचार करता हेच १० वर्ष खासदार होते. शाहूपुरी येथे यांच्याच गटाची सत्ता होती. त्याचा विचार करता यांना कोणी अडवले होते. त्यामुळे या सगळ्या भूलथापा आहेत. यांना विकासाशी काहीही घेणंदेणं नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते आणि हे वास्तव जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता शाश्वत विकासासाठी विधायक विचारांच्या पाठीशी उभे राहावे,'' असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT