vishal patil uddhav thackeray
vishal patil uddhav thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : काँग्रेसच्या जेवणाला विशाल पाटलांची एन्ट्री, ठाकरे गट खवळला; "गल्ली ते दिल्ली..."

Rahul Gadkar

Sangli News, 24 May : यंदा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त चर्चेचा राहिला तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ ( Sangli Lok Sabha Constituency ). काँग्रेसचा ( Congress ) बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस आणि नेते आक्रमक झाले. शेवटच्या क्षणी काहींनी आघाडी धर्म पाळत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तरी ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांच्यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी दर्शवली. शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला. मात्र, सांगलीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती.

4 जूनला निकाल हाती येणार आहे. मात्र, सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना ( Shivsena ) पुन्हा आमने-सामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात विशाल पाटील ( Vishal Patil ) यांची एन्ट्री झाल्यानं ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. एकीकडे आघाडी धर्म न पाळल्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना काँग्रेस नेते चिडीचूप असल्यानं आधीच ठाकरे गट संतापला होता. यातच स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्यानं पुन्हा एकदा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार ठाकरे गटाबाबत घडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी काँग्रेस हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याचा अर्थ गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या बाजूने आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. काँग्रेसची नेमकी भूमिका काय होती त्याचे उत्तर त्यांनी द्यावे," अशी मागणी ही संजय विभुते यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व गोष्टीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी खुलासा केला आहे. "आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने कामाला लागावेत, यासाठी स्नेह मेळावा आयोजित केला आहे. याचा अर्थ कोणीही कसा घेऊ नये. ठाकरेंच्या सभेला आम्ही उपस्थिती लावली आहे," असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT