Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

....तर कारखान्याच्या गोदामातून साखरेचे एक पोतेही बाहेर जाऊ देणार नाही

Vishnu Sanap

अक्कलकोट : शेतकऱ्यांचे (Farmers) थकीत वीजबील यापुढे थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कारखान्यास गेलेल्या उसाच्या बिलातून कपात करण्याचे प्रस्तावित केले आहे. हा प्रस्ताव हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो तातडीने थांबवावा, असे निवेदन अक्कलकोटचे भाजपचे (BJP) आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांना दिले आहे.

निवेदनात कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महावितरणचे (MSEB) वीजबील वसूल करण्याचे प्रयोजन आपल्या कार्यालयातून दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी होत आहे. तसेच, शेतकरी वारंवार कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जात आहेत. शासनाने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. अशा परीस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे.

आगोदरच साखर कारखान्याचे ऊसबील देण्यास विलंब करण्यात येतो आणि वर्षभर दिले जात नाहीत. त्यातून शेतकऱ्यांनी बँक, वित्तीय संस्था व सावकारी कर्ज काढलेले आहे. त्याच्या व्याजाचा भुर्दड त्यांना वाढत आहे. अशा परिस्थितीमधे साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वीजबील, ऊस बीलातून सक्तीने वसूल करण्याची कार्यवाही होवू नये, अशी कल्याणशेट्टी यांनी विनंती केली आहे.

यानंतरही ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून, वीजबील देयके कपात केले, तर अशा साखर कारखान्याच्या गोडावूनमधून आम्ही साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT