Solapur, 01 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येताना दिसत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी होत असताच माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली आहे. एकीकडे, या घडामोडी घडत असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे विधान केले आहे. ‘कोणत्या निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे, हा विषय भाजपमध्ये गौण असतो,’ असे म्हटले आहे, त्यामुळे कोणाचे नेतृत्व आमदार देशमुख यांना गौण वाटते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे (Solapur Bazar Samiti Election ) नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे विधान महत्वपूर्ण ठरते. त्यांच्या विधानामुळे भाजपमध्ये नेतृत्वासाठी किती मोठी स्पर्धा आहे, हे दिसून येते.
आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, असा आपला प्रयत्न आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्यात येईल. जे सोबत येणार नाहीत, त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यात येईल.
सोलापूर महापालिकेत विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, कोणत्या निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे, हा विषय भारतीय जनता पक्षामध्ये गौण असतो. भाजपचे कार्यकर्ते जर बाजार समितीची निवडणूक लढले, तर पक्षाचे काहीही म्हणणे नाही.
सोलापूर बाजार समितीची मागील निवडणूकही आपण एकट्याने आणि भारतीय जनता पक्षाकडूनच लढवली होती. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातील लोकही माझ्या विरोधात होते. मात्र आपण त्याचा विचार न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, अशी आठवणही सुभाष देशमुख यांनी पुन्हा एकदा करून दिली.
माजी मंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकही यापूर्वी मी एकट्याने लढलो आहे. मला माझे मत मिळावे; म्हणून ती निवडणूक लढलो. मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. मी कोणाशीही तडजोड करणार नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली जाईल, जे येणार नाहीत, त्यांच्या विरोधात निवडणूक लढू, असा स्फोटक विचारही बोलून दाखवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर बाजार समितीच्या अनुषंगाने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे भाजपचे नेतृत्व दिल्याची चर्चा आहे. कल्याणशेटी हे मंत्रिपदासाठी आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख स्पर्धक होते, त्यातच बाजार समितीच्या नेतृत्वाची धुरा कल्याणशेट्टी यांच्याकडे सोपवली आहे, त्या पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांचा टोला नेमका कुणासाठी आहे, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राजशेखर शिवदारे, अविनाश मार्तंडे, इंद्रजित पवार यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.