अहमदनगर : अहमदनगर शहरात मागील दोन वर्षांपासून शहरात बहुसंख्य पथदिवे बंद आहेत. शहरातील सर्व पथदिवे एलईडी करण्याचे स्वप्न आमदार संग्राम जगताप व तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाहिले होते. मात्र या पथदिव्यांच्या निविदा प्रक्रियेत वाद झाले होते. हे वाद थेट न्यायालयातही गेले होते. अखेर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तसेच एका कंपनीला कार्यारंभ आदेशही मिळाला आहे. Such a 'light' behind the street light statement ... a drama that happened-AA84
एलईडीसाठी महापालिकेने राज्य सरकारच्या सांगण्यानुसार ईईएसएल संस्थेला महासभेत ठराव मंजूर केला होता. मात्र या संस्थेने जास्त रक्कम मागितली. त्यामुळे ऑनलाईन ई निविदा प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले. यात दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही कंपन्यांना डेमो सादर करण्यास महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र काही स्थानिक नगरसेवकांनी त्यातील ईस्मार्ट कंपनीला डेमोच सादर करून दिला नाही. त्यामुळे दुसऱ्या कंपनीला निविदा देण्याचे महापालिकेकडून निश्चित करण्यात आले.
महापालिकेच्या या निर्णया विरोधात ईस्मार्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयीन प्रक्रियेत एलईडी प्रकल्पाला वेळ लागण्याची चिन्हे निर्माण झाली. शहरातील रस्त्यांवर अंधार परसला होता. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. आमदार संग्राम जगताप यांच्याकडेही तक्रारी आल्या त्यामुळे आमदार जगताप यांनी या प्रकरणी तोडगा निघावा यासाठी ईस्मार्ट कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावले. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. महापालिका अधिकाऱ्यांचेही म्हणे ऐकूण घेतले.
ईस्मार्ट कंपनीला पुन्हा डेमो सादर करण्यास परवानगी दिली. दोन्ही डेमोंच्या आधारे योग्य निविदा ठरवून काम देण्यास महापालिका अधिकाऱ्यांना सूचविले. त्यामुळे ईस्मार्ट कंपनीचा महापालिकेविषयीचा आक्षेप संपला. त्यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली. दोन्ही कंपन्यांचे डेमो पाहून अखेर ईस्मार्ट कंपनीला काल कार्यारंभ आदेश देण्यात आला. या कार्यारंभ आदेशामुळे आगामी 4 महिन्यांत शहरातील सर्व पथदिवे एलईडी होणार आहेत.
शहरातील रस्त्यावरील खांबांवर एलईडी दिवा बसविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज त्याबाबतची वर्क आॅर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून येत्या आठ दिवसांत दिवे बसविण्यास प्रारंभ होणार आहे. सुमारे 25 हजार दिवे शहरात बसविण्यात येतील, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.
याबाबत काल महापालिकेत बैठक झाली. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले तसेच अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील अनेक खांबांवर पथदिवे नाहीत. बल्ब खराब होणे, वायर तुटणे, दिवा फुटणे असे अनेक प्रकार घडून दिवे बंद झाले आहेत.
उपनगरांमध्ये तर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. याबाबत महापालिकेच्या सभांमध्ये वादळी चर्चा झाली होती. महापालिकेचे सुमारे 30 हजार पथदिवे आहेत. त्यातील सुमारे 25 ते 30 टक्के दिवे कायम बंद असतात. त्याच्या देखभालीचा खर्चही मोठा असतो. याबाबत नागरिकांच्या कायम तक्रारी येतात. आता नव्याने एलईडी बसविण्यात येणार असल्याने संबंधित ठेकेदार कंपनीकडे देखभाल व दुरुस्ती आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. तसेच वीजबिलातही सुमारे 13 लाखांची बचत होणार आहे. दिवाळीपर्यंत बहुतेक भागात या दिव्यांचा लखलखाट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.