sugarcane rate protest Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane Prices Protest : उसाला 3100 रुपये पहिली उचल शेतकरी संघटनाना अमान्य; साताऱ्यात दोन दिवसांचा अल्टिमेट

Sachin Fulpagare

विशाल वामनराव पाटील-

Satara News : सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाल्यानंतर ऊस कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची आज बैठक जिल्हाधिकारी यांनी बोलावली होती. या बैठकीत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

साखर कारखानदार दर जाहीर करत नसल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी यांनी कारखान्यांच्या प्रतिनिधिंना खडे बोल सुनावत दर जाहीर करा, अशा सूचना केल्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली. यामध्ये सह्याद्री, जरंडेश्वर, कृष्णा, जयवंत शुगर आणि अजिंक्यतारा साखर कारखान्यांनी पहिली उचल 3 हजार 100 रुपये जाहीर केली. मात्र, दोन दिवसांत किमान 3 हजार 500 रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या पद्धतीने उसाला दर जाहीर केले आहेत. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आजच्या बैठकीत साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना धारेवर धरत ऊस दरांवर याच बैठकीत तोडगा काढण्यास सांगितले. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले असून सह्याद्री 3100, जरंडेश्वर 3100, कृष्णा सहकारी 3100, जयवंत शुगर 3100 अजिंक्यतारा 3100 रुपये तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना 2850, शरयु 2850, किसनवीर 2850 असे दर जाहीर केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमुळे काही प्रमाणात उसाच्या एफआरपीची कोंडी जिल्हाधिकारी यांनी फोडल्याचे पाहायला मिळत आहे. ऊस दराबाबत कारखाना आणि शेतकरी संघटना यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रयत्न सफल झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत असले तरी उसाला 3500 रुपये दर मिळावा आणि मागील ऊसाचे 100 रुपये टनाला मिळावेत. या मागणीबाबत अजूनही सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना‌ ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारखान्यांनी 3100 नको 3500 दर द्यावा

जिल्हाधिकारी यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवत साखर कारखानदारांना दर जाहीर करण्यास भाग पाडले. दर जाहीर झाले ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी 3100 रुपये दर जाहीर करून चालणार नाही, तर किमान 3500 रुपये दर आम्हांला अपेक्षित आहे. तसेच मागील बिलापोटी कोल्हापूरच्या धरतीवरती आम्हाला दर मिळावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला अपेक्षित दर न मिळाल्यास पुढील 2 दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सातारा, सांगली जिल्ह्यातील ऊसदराबाबत आम्ही भूमिका जाहीर करू, असे सातारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी सांगितले.

Edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT