Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

सुजय विखेंचे शिवसेना खासदारांना आव्हान : मोदींच्या फोटो शिवाय निवडणूक लढवून दाखवावी

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. त्यांच्या दौऱ्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. यावर भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी टीका केली होती.

आदित्य ठाकरेंच्या यात्रेला होणाऱ्या गर्दी बाबत डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, कॅमेऱ्याला ज्या पद्धतीने दाखवायचे आहे त्यापद्धतीने केलेले ते चित्रीकरण आहे. गर्दी सर्वांच्याच सभेला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभेला गर्दी होते. लोकांना काय नवपण आहे ते पाहण्याचे कुतुहल असते. त्यांना प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी केलं ते आज करत आहेत. गर्दी कितीही झाली तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच निश्चित करतील की 40 आमदारांनी घेतलेली भुमिका योग्य की अयोग्य आहे. आगामी दोन महिन्यांचाच तो विषय आहे. तुम्ही कितीही गर्दी केली आणि मते पडत नसतील तर त्याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेने बंडखोर खासदारांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते. यावर खासदार विखे यांनी सांगितले की, त्यांच्याही खासदारांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा उपयोग करून निवडणूक लढविली होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकांत शिवसेनेने मोदींचा फोटो मोठा करून दाखविला. तुम्ही शिवसेनेची पत्रके, फ्लेक्स पहा. उमेदवार दिसत नव्हता एवढा मोठा मोदींचा फोटो होता. लोकसभेच्या वेळी तर आवर्जुन त्यांनी मोदींचे फोटो लावले. त्यांना माहिती होते की, मोदींची सध्या लाट आहे. ते जसे आव्हान करतात तसे आमचे प्रतिआव्हान आहे की, शिवसेनेच्या उरलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन एक तरी निवडणूक मोदींच्या फोटो शिवाय लढवून दाखवावी, असे आव्हानच त्यांनी दिले.

आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मतदान पडण्याचा काळ गेला. सुजय विखे खासदार झाले यात माझे आजोबा, वडील यांच्या कार्याचे योगदान 50 टक्के असते. मात्र 50 टक्के पक्ष व स्वकर्तृत्त्वावर आपले स्थान निर्माण करावे लागेत. तुम्ही कोणत्या कुटुंबातील आहात. कोठून आला आहात. तुमचे वडील कोण होते, आजोबा कोण होते. या गोष्टी आजच्या राजकारणात 50 टक्केच प्रभाव करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

गर्दी व मतांत फरक

ठाकरे कुटुंबातील कोकणाच्या बाहेर पडलेले ते पहिलेच नाहीत. शिवसेनेला महाराष्ट्रात सत्ता मिळाली ती भाजपच्या जीवावर मिळाली होती. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील योजनाकडे पाहून शिवसेनेला मतं मिळाली होती. आमचे एकत्रितपणे 165 आमदार निवडून आले होते. अनेक वेळा गर्दी झालेली मी पाहिली आहे मात्र त्याचे मतात परिवर्तन होतच असे काही नाही. गर्दी व मतांत फरक आहे, असे त्यांनी सांगितले.

आम्हीही शिवसेनेत होतो. काँग्रेसमध्ये आलो. भाजपमध्ये आलो. या तीन पक्ष चिन्हावर आमच्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पडला नाही. 40 आमदार काही दूध खुळे नाहीत. ते तिसऱ्यांदा अथवा चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत. कोणी येण्याने अथवा जाण्याने फरक पडत नाही. आपण मतदार संघाला एक कुटुंब म्हणून संभाळतो. मलाही लोकसभेत पाडण्याचा प्रयत्न झाला, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT