Swabhimani Sanghatna Agitation
Swabhimani Sanghatna Agitation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : स्वाभिमानीने खटाव तालुक्यातून फुंकले ऊसदर आंदोलनाचे रणशिंग....

अय्याज मुल्ला

वडूज : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि चालू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय आम्ही कारखाने चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पेडगांव (ता.खटाव) येथे संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व आंदोलनाच्या नियोजनाची बैठक झाली. त्यावेळी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊसदराच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजार रूपयांच्या आसपास दर देत असताना खटाव मध्ये मात्र, हा दर अडीच हजार रुपयाच्या आसपास रेंगाळला आहे. केंद्र सरकारने चालू हंगामासाठी १५० रुपये एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी रिकव्हरी बेस दहा टक्क्यांवरून १०.२५ टक्के केल्याने प्रत्यक्षात ७७ रुपयांची वाढ शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. मात्र, ही वाढ ही खटाव मधील कारखानदार द्यायला तयार नाहीत.

जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख म्हणाले, दोन-तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोपुजच्या ग्रीन पावर शुगर, पडळच्या खटाव माण शुगर व वर्धनी शुगर या कारखान्याच्या व्यवस्थापनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र कुणीही पहिल्या उचलीची घोषणा केली नाही, त्यामुळे संघटना संतप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद देवकर, दत्तूकाका घार्गे, राजू फडतरे आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT