Bachchu Kadu, Rahul Ghule News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha News : बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये ; 'स्वाभिमानी' संतापली

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : जिल्ह्यात खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळाचे सावट असताना प्रहार संघटनेचे नेते आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा हे रडगाणे कायमचे झाले आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करा, असे वक्तव्य करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटीला गेलेल्याची नशा अद्याप उतरली नसल्यामुळे असे बेफाम वक्तव्य मंत्रिपदाच्या लालसेपोटी ते करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले यांनी केला.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा हे रडगाणे कायमचे झाले आहे. हे रडगाणे बंद करावे आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा असा सल्ला दिला. त्या आरोपाचा समाचार घेत घुले यांनी जिल्ह्यातील 91 मधील 81 महसूल मंडळमध्ये जून ते ऑगस्ट या दरम्यान पाऊस पडला नाही, असे सांगितले. त्यामुळे खरीप पिके पूर्णपणे संकटात आली अशा परिस्थितीत शासनाने नुकसान झालेल्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेताना विमा कंपनी आणि कृषी खाते यांच्यात साटेलोटे झाल्यामुळे निम्म्याहून अधिक महसूल मंडले यामध्ये वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्ह्याच्या हक्काचे पाणी अद्याप शेतीला मिळत नाही, म्हैसाळ योजनेचे पाणी टेल असलेल्या मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला वेळेवर दिले जात नाही. यासह इतर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथील प्रांत कार्यालायसमोर आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यातील काही प्रश्न मार्गी लागण्यात यश आले. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळ आणि दुष्काळाचे रडगाणे हे कायमचे नसून जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या उपसा सिंचन योजना व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यास जिल्ह्याला दुष्काळाची तीव्रता भासणार नाही, शेतीचा उत्पादन खर्च कमी करा, असा सल्ला देताना गेले दहा वर्षांत शेतीला आवश्यक असणाऱ्या खताचे दर मोठ्या प्रमाणात कुणी वाढवले, असा सवाल त्यांनी केला.

उत्पादित मालाला दर नसल्यामुळे शेतीवर केलेला उत्पादन खर्च कमी कसा होणार याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी आपण बोलणे अपेक्षित होते. पण उलट राहिलेल्या दिवसांत भाजप (BJP) आपल्याला मंत्रिपदाची संधी देईल, या आशेपोटी आपण अशी बेफाम वक्तव्य करू नयेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यानंतर आपणाला राज्यभरातून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांना न्याय देणारा एक मसिहा म्हणून पाहिले जाते तरी आपण या जिल्ह्यात येताना जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन अशी वक्तव्य करणे अपेक्षित होते. परंतु सत्ताधाऱ्यांना खूष करण्यासाठी अशी चुकीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांची नाराजी विनाकारण पदरात पाडून घेऊ नये, असा सल्ला अॅड. घुले यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT