Swabhimani Shetkari Sanghatana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Farmer Protest :'स्वाभिमानी'चं वादळ अखेर शमलं; शेट्टींच्या लढ्याला यश, कारखानदारांकडून मागण्या मान्य; पण...

Rahul Gadkar

Kolhapur News : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कारखानदारांनी मागणी मान्य केल्यानंतर अखेर थांबले आहे. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे, त्यांनी 100 रुपये, तर 3000 पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.

याला सर्व कारखानदारांनी संमती दिल्यानंतर आजचे चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कारखान्यांची पत्र आल्यानंतर तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3100 रुपये द्यावी, शिवाय जोपर्यंत सर्व कारखान्याचे मागील तुटलेल्या उसाला 100 रुपये उसाचे पत्र येत नाही. तोपर्यंत तोड नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या पत्रकात काय? -

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन 2022-23 मधील शेतकऱ्यांना मिळालेल्या उसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरू झाली होती. त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उसाचा दर प्रतिटन रुपये 3000 पेक्षा कमी दर ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे. त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना रुपये 100 रुपये अतिरिक्त प्रतिटन द्यावे.

ज्यांनी रुपये 3000 पेक्षा जास्त दर प्रतिटन दिलेला आहे. त्या साखर कारखान्यांनी रुपये 50 रुपये प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. या बाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा. पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे.

तसेच, दोन महिन्यांनंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी द्यायची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव उसाचे दर मागणीविषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

राजू शेट्टी यांचा मोर्चा सांगलीकडे -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला कोल्हापुरात यश आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा सांगलीकडे वळवणार असल्याची घोषणा आंदोलन स्थगितीदरम्यान केली. कोल्हापुरात मागणी मान्य होताच शेट्टी यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT