Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पिचडांच्या मागे उभे राहिले तरच अगस्ती कारखाना टिकेल

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आज अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील सभासदांना आवाहन केले. हे आवाहन सध्या जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. ( The Agusti factory will survive only if it stands behind Pichad )

या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नायकवाडी, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवाजीराव धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, "महाराष्ट्राच्या विधीमंडळात माझा व मधुकरराव पिचड यांचा प्रथम परिचय झाला. त्यावेळी ते मंत्री होते. लोकांत मिळून मिसळून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. पिचडांच्या पिढीने देशात विकास करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नातून परिवर्तन आले आहे. मात्र अजूनही काम करण्याची अवश्यकता आहे. कारण ग्रामीण, आदिवासी भागातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. गरिबी व उपासमार संपली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्य अपूर्ण आहे. समाजातील शोषित, पीडित जनतेची सर्वांगिण प्रगती व उन्नती करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे," असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "कोणताही व्यक्ती जाती, पंथ, धर्माने मोठा नाही. कोणी मोठा असेल तर तो त्याच्या कार्याने मोठा आहे. त्यामुळे येणार काळ जाती, धर्म विरहित तसेच समाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठीची समाजरचना उभी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षण व विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे," असे मत त्यांनी मांडले.

"देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. अगस्ती सहकारी साखर कारखाना टिकायचा असेल तर मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड कारखान्याच्या सत्तेत राहिले पाहिजेत," असे त्यांनी सांगितले.

"मी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेलो नाही. पिचडांच्या मागे उभे राहिले तर कारखान्याचा विकास होईल. अगस्ती कारखाना टिकेल. कारखान्याचा विकास झाला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विकास होईल. नाही तर इतर कारखाने जसे बंद झाले तशीच या कारखान्याची अवस्था बिकट होईल," असा सूचक इशाराही त्यांनी कारखान्याच्या सभासदांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT