MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : राज्यपालांचा माफीनामा नव्हे, राजीनामाच पाहिजे... उदयनराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच देशाला एकत्र ठेवणार आहेत. ज्यांचा जनतेने सन्मान ठेवला, तेच छत्रपतींचा अपमान करत असून, हे सर्वजण कोडगे झाले आहेत. त्यामुळे छत्रपतींविषयी बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. येत्या शनिवारी रायगडावरील आत्मक्लेष आंदोलनानंतर राज्यपालांना हिसका दाखवला जाईल. त्यांनी माफी मागून चालणार नाही, राजीनामाच दिला पाहिजे, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून पुन्हा राज्यपालांवर तोफ डागली. इतर सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.

उदयनराजे म्हणाले,‘‘लोकांचा देशाच्या व राज्याच्या कारभारात सहभाग असावा, म्हणून लोकशाही स्थापन केली. यातून सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले. आज सर्वच लोकप्रतिनिधी व पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. पण, आता त्यांच्याबद्दलच अपशब्द वापरून थोर पुरुषांचा अपमान करत आहेत. पण, शिवाजी महाराजांचे विचारच देशाला एकत्र ठेवणार आहेत. या विचारांचा विसर पडला तर देशाचे तुकडे होतील.

ज्यांचा जनतेने सन्मान केला, तेच आता छत्रपतींचा अपमान करत आहेत. त्यातून हे लोकप्रतिनिधी कोडगे झाल्याचे दिसत आहे. कोणताही पक्ष, संघटना, चळवळ असू देत, या सर्वांचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपतींविषयी बोलणाऱ्या या सर्वांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात आणले पाहिजे. अन्यथा भविष्यात सर्वांच्या अंगवळणी पडेल. याप्रकरणी आम्ही बांगड्याही भरलेल्या नाहीत आणि हतबलही नाही. पण, सगळ्या पक्षांनी भूमिका मांडली पाहिजे.’’

पुण्यात भूमिका मांडताना तुम्ही भावुक झाला होता, त्याबाबत विचारले असता ते म्हणाले,‘‘ मनाला वेदना होत होत्या म्हणून भावनाविवश झालो होतो. आमचा रडण्याचा नव्हे, तर लढण्याचा इतिहास आहे. पहिल्यापासून आम्ही संघर्ष करत आलो आहे. मी लढणार आहे. त्यामुळे येत्या तीन तारखेला रायगडावर आत्मक्लेष आंदोलनानंतर राज्यपालांना हिसका दाखवणार आहे. त्यांनी माफी मागून चालणार नाही, त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे.’’

त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकारच नाही

काही जणांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्याविषयी खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले,‘‘जे लोक राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करत असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये. त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकारच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT