Solapur, 01 June : सर्वार्थाने ‘सेफ’ असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापुरातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी होती. मात्र, खरी लढत दोन माजी आमदार असलेले पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि बार्शीचे राजेंद्र राऊत यांच्यात झाली. अखेर राऊत यांनी बाजी मारली आणि विधीमंडळ प्रवेशासाठी परिचारकांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा आली. पण राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विक्रमी कामगिरी, सामाजिक समीकरण आणि भाजप नेत्यांचा पाठिंबा हे चार फॅक्टर उमेदवारीसाठी महत्वपूर्ण ठरले आहेत.
विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोलापूर मतदारसंघाची मागील अवघड निवडणूक प्रशांत परिचारक यांनी चमत्कारकरित्या जिंकून भाजपला यश मिळवून दिले होते. तसेच, भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या शब्दामुळे परिचारक यांना उमेदवारी मिळेल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. मात्र, तो साफ फेल ठरला आहे.
प्रशांत परिचारक यांनी गेल्या दोन निवडणुकीत केलेल्या त्यागापेक्षा राजेंद्र राऊत हे वरचढ ठरले आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला होता. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला सुरू केला होता. पण त्यावेळी भाजपच्या १०५ आमदारांपैकी बार्शीचे तत्कालीन आमदार राजेंद्र राऊत यांनी फडणवीस यांची पाठराखण करत जरांगे पाटील यांना काही प्रश्न केले होते.
राऊत यांच्या भूमिकेवर त्यावेळी जरांगे पाटील यांनीही हल्लाबोल केला होता. बार्शीत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण, राऊत यांनी आपले श्रेष्ठी असलेले देवेंद्र फडणवीस यांचा बचाव केला होता. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही आपल्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता राऊत यांनी ती भूमिका घेतली होती. हा मुद्दा यावेळी महत्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे.
यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील आणि बाहेरील नेत्यांनीही उमेदवारीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी परिचारक यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपुरा ठरला. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजप नेत्यांचाही राऊतांना पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील पराभवानंतर राऊत यांनी मागच्या काळात झालेल्या चुका सुधारत आखणी केली आणि त्या दिशेने वाटचाल केली. त्यातून त्यांना बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका निवडणुकीत यश मिळविले.
बार्शी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच सर्व जागा राऊतांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्या. या उलट परिचारक यांना पंढरपूर नगरपालिकेची सत्ता गमावावी लागली. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत संघर्ष करावा लागला. त्या तुलनेत राऊत यांचे यश ठळकपणे दिसणारे होते.
सामाजिक समीकरण परिचारकांच्या उमेदवारीच्या आड
भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात राज्यातील सामजिक समीकरणांचा बारीक विचार केल्याचे दिसून येते. भाजपकडून मराठवाड्यात एक ब्राह्मण उमेदवार देण्यात आल्याने मराठवाड्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या सोलापुरात पुन्हा परिचारक यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाचा उमेदवार देणे पक्षाने टाळल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.