Deepak Kesarkar
Deepak Kesarkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दीपक केसरकरांवर ऐशी झाली साईबाबांची कृपा...

सतीश वैजापूरकर

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - शिवसेनेतील दोन गटांपैकी खरी शिवसेना कोणती यावर काल ( बुधवारी ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी सुरू असताना बंडखोर आमदारांचे प्रवक्त दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) हे मात्र शिर्डीत साईबाबांची आरती करत होते. या आरतीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्यावर साईबाबांची कृपा कशी आहे, हे सांगितले. ( This is how Saibaba graced Deepak Kesarkar... )

विधानसभा आणि राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची फुटलेली मते आणि त्यापाठोपाठ कोसळलेले महाविकास आघाडी सरकार या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी येथे साई समाधीचे दर्शन घेतले होते. त्यात प्रामुख्याने ठाकरे यांचे सल्लागार मिलिंद नार्वेकर आणि माजी मंत्री अनिल परब यांचा समावेश होता. गुवाहाटीतून परतल्यानंतर मतदारसंघात जाण्यापूर्वीच केसरकर यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले होते. आज त्यांनी पुन्हा येथे येऊन दर्शन घेतले. त्यावेळी साईंच्या शालीची ही कहाणी कथन केली.

दीपक केसरकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार तयार होताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते आणि आम्ही सर्व आमदार एकाच हॉटेलात वास्तव्यास होतो. फक्त मला एकट्याला साईदर्शनासाठी शिर्डीला येण्याची परवानगी मिळाली. मी येथून साईंची शाल घेतली आणि ठाकरेंना दिली, तर ते मुख्यमंत्री झाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी साईंची शाल घेऊन मी निघालो आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतील एकी कायम टिकू दे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार असू दे, अशी साईचरणी प्रार्थना केली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जी भावना होती, तीच खासदारांच्या मनात होती. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढलो आणि त्यांच्या सोबत सत्तेत गेलो. जनतेने ज्या दोन्ही काँग्रेसच्या विरोधात मतदान केले, त्यांना आम्ही काय सांगणार, हा प्रश्न आमच्या समोर होता. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एवढी मोठी फूट पडली. पंच्याहत्तर टक्के आमदार आणि खासदार एका बाजूला आहेत. पंचवीस टक्के शिल्लक राहीले ते भ्रम पसरवतात. शिवसेना लवकरच एकसंध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. लोकांच्या मनातले सरकार राज्यात सत्तेत आले आहे.

आम्ही आज निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडू. या सर्व लढाईत सत्याचा विजय होईल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.

- दीपक केसरकर, बंडखोर आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT