Uday Shelke
Uday Shelke  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा सहकारी बँकेत श्रेयवाद करणाऱ्यांना उदय शेळकेंनी लगावला टोला

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत पीक कर्ज वाढविण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी घेतला असे सांगण्यात येत होते. यावर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी काल ( गुरुवारी ) 'सकाळ'शी बोलताना शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांच्यावर नाव न घेता टीका केली.

अॅड. उदय शेळके म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच शेतकरी हित जोपासले. जिल्हा बँकेतही आम्ही सर्व महाविकास आघाडीचे संचालक ते जोपासण्याचे काम करत आहोत. पीक कर्जाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला कोणा एका संचालकाने नव्हे. जेवण महाविकास आघाडीचे आहे वाढप्यांनी भाव खाऊ नये, अशी टीका अ‍ड. उदय शेळके यांनी केली आहे.

अ‍ॅड शेळके पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांची कामधेनू असणार्‍या जिल्हा बँकेने शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पीक कर्जाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज मर्यादा एकरी 20 हजारांवरून 30 हजार करण्याबाबत सर्व संचालकांनी सूचना केल्या आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे श्रेय कोणा एका संचालकाचे नाही.

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शेतकर्‍यांना मदत करण्याच्या अनुषंगाने एकरी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा विषय संचालकांनी मांडला. पीक कर्जाच्या जोडीने पशुधनासाठीच्या कर्जाचा विषयही मांडला गेला. शेतकरी हिताचे निर्णय जिल्हा बँकेने सातत्याने घेतले असून या पुढच्या काळातही बँकेची तीच भूमिका राहणार असल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅड. शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिले.

शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायमच आम्हाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत कामकाज केले जात आहे. पीक कर्जाची एकरी मर्यादा 20 हजाराहून 30 हजार करण्याचा निर्णय त्यामुळेच आम्ही सर्व संचालकांच्या मागणीनुसार आणि चर्चेनुसार घेतला.

दरम्यान, काही तालुक्यांमध्ये गरज नसताना पशुपालनासाठी कर्ज वाटले गेले असून त्यांची थकबाकी वाढत चालली असल्याबद्दल आपणास चिंता असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. पशुपालन कर्ज वाटप झालेले काही तालुके पुढील दोन- तीन वर्षे शेती कर्जाला मुकण्याची भीतीही अॅड. शेळके यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT