Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महामार्गाच्या संथगतीच्या कामांवरून उदयनराजे संतप्त; महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ठणकावले...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : पुणे-सातारा महामार्गाचे काम २०१३ मध्ये पूर्ण होणे गरजेचे होते, मात्र, २०२२ आला तरी पुलांची, सेवा रस्त्यांची आणि विविध छोटी-मोठी कामे अपूर्ण आहेत. तसेच खंबाटकी बोगद्याच्या कामाला केंद्राकडून निधीची कोणतीही कमतरता नसतानाही हे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाची कामे मंद गतीने होणार असतील तर याचा फटका अधिका-यांना नव्हे तर, सामान्य लोकांना बसतो. याचे भान महामार्ग प्राधिकारणाच्या अधिका-यांनी ठेवले पाहिजे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ठणकावले.

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी तसेच सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना महाबळेश्वरमार्गे कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला पोलादपूर-सुरूर राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील रस्ते वाहतूक संदर्भात असलेल्या अनेक प्रश्नांवर पुणे येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिल्या.

बैठकीमध्ये शेंद्रे ते कागल सहापदरीकरण, पुणे-सातारा, खंबाटकी बोगदा, कराड आणि सातारा शहरातील फ्लायओव्हरचे सुशोभिकरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणामार्फत सुरु असलेल्या विविध कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. पोलादपूर-महाबळेश्वर-पांचगणी-वाई-सुरुर हा सध्याचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करून जाहिर होणेबाबतचा प्रस्ताव द्यावा. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास, त्याचे जमिन हस्तांतरणाची रक्कम आणि अनुषंगीकबाबींची सोडवणुक करण्यासाठी आपण स्वतःपाठपुरावा करु.

पुणे ते सातारा या रस्त्याचे काम २०१३ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. आज २०२२ सुरु होऊन दोन महिने उलटत आले तरी अद्याप या रस्त्यावरील पुलांची, सेवा रस्त्यांची आणि विविध छोटी-मोठी कामे अपूर्ण आहेत. मंदगतीने काम होत असल्यास, त्याचा फटका अधिका-यांना नाही तर सामान्य लोकांना बसतो, याचे भान प्राधिकारणाच्या संबंधित अधिका-यांनी ठेवले पाहिजे. तीच अवस्था खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याची आहे. केंद्राकडून निधीची कोणतीही कमतरता नसतानाही आजमितीस फक्त २४ ते २५ टक्के काम झाले आहे. अशा गतीने काम पूर्ण होण्याला किती वेळ लागेल याची जाणीव ठेकेदारांना आहे का, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

सातारा आणि कराड शहराजवळुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरब्रिज बांधले आहेत. त्या खालील जागेचा सुयोग्य विकास होणे आवश्यक आहे. नाहीतर गलिच्छपणा आणि अतिक्रमणांची भर याठिकाणी पडणार आहे. त्यामुळे ओव्हरब्रिजच्या खालील जागांचे सुशोभिकरण करण्याची कार्यवाही करावी. याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने पोलिस चौकी, गार्डन, पार्किग, छोटेखानी भाजीमंडई, व्हर्टिकल गार्डनिंग आदी उपयुक्त योजना राबविण्याचीही सूचना केल्या.

पोलादपूर ते सुरुर हा राज्यमार्गावर प्रचंड वाहतुक असते. तसेच या मार्गावर अपघात देखील वारंवार झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तथापी हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे वर्ग झाल्यास, रस्ता रुंदीकरणासंबंधातील जमिन हस्तांतरण प्रक्रिया, तसेच अनुषंगीक बाबी याकरीता केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्याकडे आपण जरुर तो पाठपुरावा करु.

बैठकीत सूचवलेल्या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. बैठकीस शेंद्रे-कागल महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. कंधारकर, पुणे सातारा महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री. कदम, आणि राष्ट्रीय महामार्ग संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प संचालक श्री. देशपांडे यांच्यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT