Late Vilasrao Patil, Advt. Udaysinh Patil Undalkar
Late Vilasrao Patil, Advt. Udaysinh Patil Undalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उंडाळकरांची स्वप्नपूर्ती; 'अथणी-रयत'ने केले पाच लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप

हेमंत पवार

कऱ्हाड : शेवाळेवाडी-म्हासोली (जि. सातारा) येथील अथणी शुगर्स - रयत साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १६० दिवसांत कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. उच्चांकी गाळपामुळे माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.

डोंगरी विभागात कारखानदारी आणून हा भाग सुजलाम सुफलाम बनवताना रयत कारखान्याने पाच लाख मेट्रीक टन पेक्षा जास्त ऊस गाळप व शेजारील कारखान्याच्या बरोबरीने उसाला दर द्यावा अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक (कै) विलासराव उंडाळकरांची होती. गेली सहा गळीत हंगामात अथणी रयतने एक एक टप्पा गाठत यावर्षी पाच लाख टन गळीत पार करत काकांची ही स्वप्नपूर्ती केली आहे.

यानिमित्ताने रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या हस्ते युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील यासह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. ॲड. उंडाळकर म्हणाले, ''अथणी-रयतच्या भागीदारीस यशस्वी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षे पूर्वी कारखाना विक्री करावा लागतो की काय, अशी अवस्था होती.

मात्र, त्या अडचणीतून (कै) विलासकाका आणि अथणीचे अध्य़क्ष आमदार श्रीमंत पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आज रयत कारखाना पूर्णपणे कर्ज मुक्त झाला आहे. स्पर्धात्मक ऊस भाव देण्यास सक्षम बनला आहे. काकांनी कारखानदारी उभी करताना शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. यंदा कारखान्याचे पाच ख मेट्रीक टन गळीत पूर्ण झाले आहे. त्यामध्ये कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. यापुढील काळात कारखान्याची विस्तारवाढ करून कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.''

युनिट हेड रवींद्र देशमुख म्हणाले, कारखान्याने १६० दिवसात पाच लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. १२.२० टक्क्यांनी साखर उतारा राखत सहा लाख नऊ हजार साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. १५ मार्च पर्यंतची ऊसाची बिले व तोडणी वाहतूकदारांचे वाहतूकीचे पैसेही त्यांना दिले आहेत. अथणी-रयतच्या या यशात संस्थापक (कै) विलासकाका यांनी घालून दिलेले आदर्शवत विचार मोलाचे ठरले आहेत. रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स योगेश पाटील, सुशांत पाटील यांचे मार्गदर्शन व अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT