Pani Parishad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pani Parishad : पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची भाषा करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर नायायची तयारी ठेवा ; वैभव नाईकवाडींचा एल्गार

हुकूम मुलाणी

Mangalveda (Solapur) : दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या अनेक घोषणा सरकारकडून होतात. पण, प्रत्यक्षात खर्चाची तरतूद होत नाही. पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची भाषा करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर नायायची तयारी ठेवावी, असे आवाहन पाणी चळवळीचे निमंत्रक वैभव नाईकवाडी यांनी केले. (Warning to the government in the Water Council at Mangalveda )

राज्यातील १३ दुष्काळी तालुक्यांची ३१ वी पाणी परिषद मंगळवेढ्यात (Mangalveda) झाली. त्या पाणी परिषदेत नाईकवाडी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजीराव काळुंगे हे होते. पाणी परिषदेचे निमंत्रक नाईकवाडी म्हणाले की, पाणी परिषदेचा लढा सुरू झाल्यानंतर अनेक सरकारे आली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पाणीप्रश्न सुटला नाही. या परिषदेने जनतेला, सरकारला जागे केल्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या. काही योजना अजून प्रलंबित आहेत.

पाणी चळवळ अधिक सक्षम झाली पाहिजे. राज्य व केंद्र सरकारच्या अधिकारात ज्या योजना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू. पण, घरात बसून प्रश्न उपस्थित केला, तर पाणी येणार नाही, त्यासाठी चळवळीत उतरावे लागेल, असेही नाईकवाडी यांनी स्पष्ट केले

प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आपापसातील भांडणे व आरोप-प्रत्यारोप थांबवून, रखडलेल्या पाणीप्रश्नाला निधी द्यावा. पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याच्या इशारा देण्याऐवजी सरकारला वाकवण्याची तयारी ठेवावी. मुंबईत ५५ व्या मजल्यावर पोहण्यासाठी पाणी चढते, शेतीला देताना मात्र भाग चढावर आहे, असे सांगून टाळले जाते. मंगळवेढा, बार्शी, लातूर, उस्मानाबाद यांचाही कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर हक्क आहे. महाराष्ट्राने पाणी अडविले नसल्याने कर्नाटक सरकारला त्याच्या धरणाची उंची वाढवावी लागली. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्यातील कामासाठी दोन हजार कोटींच्या कामाचे टेंडर काढले. वर्क आर्डर झाली; पण कामास सुरूवात नाही.

अॅड बाबासाहेब देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर या देशातील शेतकऱ्यालाच पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. सांगोल्याच्या पाण्यासाठी (स्व.) आबासाहेबांचे योगदान विरोधी पक्षालादेखील मान्य आहे. इथल्या पाण्याचे श्रेय इतरांना घेण्याचा अधिकार नाही.

अध्यक्षपदावरून शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, सरकार कोणाचेही असो पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही. या परिषदेत मांडलेले ठराव आपणास शासनदरबारी नेऊन पाठपुरावा करावा लागेल. मंगळवेढा तालुक्यावर मोठा अन्याय सुरू आहे. म्हैसाळचे पाणी लगेच बंद केल्याने फक्त जनावरांची तहान भागली; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (स्व.) भारत भालके यांनी पाठपुरावा केलेल्या त्या योजनेसाठी पूर्ण ताकदीने परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सीताराम कारखान्याच्या राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की, स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाच्या बरोबरीने आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, हे दुर्दैवआहे. पाण्याच्या चळवळीत (स्व.) नागनाथ नाईकवाडी, (स्व.) गणपतराव देशमुख यांच्याबरोबर शिवाजीराव काळुंगे यांचे मंगळवेढ्याचे योगदान कौतुकास्पद ठरले.

या वेळी अॅड भारत पवार, दामोदर देशमुख, बी. बी. जाधव, भाई चंद्रकांत देशमुख यांची भाषणे झाली. या परिषदेत १२ ठराव मंजूर करण्यात आले. सुत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी, तर अॅड राहूल घुले यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT