K. Chandrashekar Rao, Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BRS News: 2024 च्या निवडणुकीत 'बीआरएस'चा महाराष्ट्रात काय प्लॅन असणार? भालकेंनी सांगितली 'अंदर की बात'

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News: पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके उद्या (दि.27 जून ) तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत 'बीआरएस'पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसणार आहे. मात्र, भगिरथ भालके हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का देत आहेत, याचे कारण आता खुद्द भगिरथ भालके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

सध्या के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'बीआरएस'ने मोठा प्लॅनही आखल्याची चर्चा आहे. आता याबाबतच भगिरथ भालके यांनी महत्वाची माहिती सांगत के.चंद्रशेखर राव यांचे राज्यातील 288 मतदारसंघावर लक्ष असल्याची अंदर की बात सांगितली आहे.

यावेळी भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण सांगत पक्षावर गंभीर आरोपही केले आहेत. भालके म्हणाले, "खरं तर मला राष्ट्रवादी सोडण्याची वेळ पक्षानेच आणली. माझे वडील (भारतनाना भालके) तीनही वेळी जनता हाच पक्ष मानून ते निवडणुकीला सामोरे गेले. येथील जनतेने देखील भारतनाना भालके हाच आमचा पक्ष म्हणून त्यांना आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली ".

"भारत नाना भालके यांच्यानंतर माझ्यावर सावली धरण्याचं काम येथील जनतेने केलं. पण मागच्या पोटनिवडणुकीत माझा फक्त 3600 मताने पराभव झाला. मात्र, तरीही त्यानंतर मी कामाला लागलो. मी चेअरमन असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीबद्दल महाविकासआघाडीचे सरकार असताना मदतीची मागणी केली होती. पण आम्हाला कायम दुय्यम वागणूक देण्यात आली ", असा गंभीर आरोप भगिरथ भालके यांनी केला.

"पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला दुय्यम वागणूक दिली. बँकेचे प्रमुखच ऐकत नसल्याचे त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं. पण हे सगळं घडत असताना आम्ही तेव्हापासून आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अभिजीत पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला त्यांचेही स्वागत आम्ही केलं. पण त्यावेळी तेथील पक्ष निरिक्षकांनी केलेली टीका टिप्पणी ही आम्हाला न पटणारी आहे. त्यामुळे त्याची सल गेल्या काही दिवसांपासून दिसून आली ", असं ते यावेळी म्हणाले.

"अभिजीत पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी थेट विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. याचा अर्थ तुमच्यासाठी भगिरत भालके महत्वाचे नव्हते. मी नाही तर येथील एकाही पक्षाच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं गेलं नाही. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. म्हणून जनभावनेचा आदर करून मी 'बीआरएस'मध्ये प्रवेश करण्याच निर्णय घेतला ", असं त्यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हाला संपर्क केला. त्यानंतर आम्हीही त्यांना भेटून आमचं म्हणनं माडल्याचं यावेळी भालके यांनी सांगितलं.

'बीआरएस'चा महाराष्ट्राबद्दल प्लॅन काय?

"तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. के.चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रातील 288 मतदारसघांवर लक्ष ठेवून आहेत. एवढंच नाही तर बीआरएस पक्ष महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने उतरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 ला बीआरएस पक्ष महत्वाच्या भूमिकेत असेल", असा थेट प्लॅनच यावेळी भालके यांनी सांगितला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT