Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस पक्षात सध्या कोणाला राहावे वाटेल : राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

सरकारनामा ब्यूरो

सांगली : ‘‘सध्या काँग्रेसला (congress) देशात नेतृत्व राहिलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना जी काही अवस्था सुरू आहे, ती पाहता त्या पक्षात राहावे, असे कोणाला वाटेल,’’ असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. (Who should stay in the Congress party now : Radhakrishna Vikhe's criticism)

सांगली जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजारग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. या वेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सीईओ जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेसचे नेते आपल्या माध्यमातून भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत का, या प्रश्नावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे वैश्विक नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्याबाबत योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले जातील. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करण्यापेक्षा सध्या पक्षाचे काँग्रेस छोडो सुरू आहे, त्यावर काम करणे गरजेचे आहे.’’

भाजपमध्ये सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना दुसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक भाजप ज्येष्ठ नेत्यांना ओव्हरटेक केले आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझा आत्तापर्यंतचा अनुभव आणि विविध खात्यांत केलेले काम पाहता भाजपने मला ही संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली मी दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय.’’

राज्यातील सहकारी दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आदेश मी देत आहे. या संस्था का बंद पडल्या? याच्या मुळाशी जायला हवे.महानंद सारख्या मोठ्या संस्थेची अवस्था आज बिकट झाली आहे. एक लाख लिटरपेक्षा कमी दूध संकलन होत आहे. त्याचे व्यवस्थापन परवडत नाही. त्यामुळे दूध संघ बरखास्त केला आहे. तेथे प्रशासक नेमला असून ही संस्था आता राष्ट्रीय डेअरी बोर्डकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू नये अशी आमची भूमिका आहे.

वाईनबाबत मंत्रीमंडळ ठरवेल

राज्यात मॉल आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत विचारले असता विखे-पाटील म्हणाले, ‘‘हा विषय मागील सरकारने घेतला होता. आम्ही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आग्रह करत होतो, त्यांनी वाईनचा निर्णय घेतला होता. आता तो विषय पुन्हा समोर आला तर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT