Ram Shinde News, Ahmednagar News in Marathi
Ram Shinde News, Ahmednagar News in Marathi Sachin Agarwal
पश्चिम महाराष्ट्र

राज्यसभेचे तिकीट का कापले : राम शिंदेंनी ऐकविला किस्सा

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगरपालिकांची निवडणूक आगामी पाच महिन्यांत होणार आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड सत्कार कार्यक्रमाचे आयोजन काल (मंगळवारी) सायंकाळी सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राजसभेची मिळालेली उमेदवारी का गेली, याचा किस्सा उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना सांगितला. (Ahmednagar BJP News Updates)

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अॅड. अभय आगरकर, शिवाजीराव गोंदकर, सोनाली नायकवाडी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग, सुवेंद्र गांधी, सचिन पोटरे आदी उपस्थित होेते.(Ram Shinde News)

राम शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील मोजक्याच लोकांना विधानपरिषदेवर जाण्याचे भाग्य मिळाले. यात सूर्यभान वहाडणे, ना.स. फरांदे, गोविंदराव आदिक, रामदास फुटाणे, यशवंतराव गडाख आदींचा समावेश आहे. त्यांत आता माझा समावेश झाला याचा आनंद आहे. विधानपरिषदेचे तिकीट मिळताच मी शिवाजीराव कर्डिले यांना फोन करून कळविले की, तुमचा तो ठराव उपयोगी पडला. त्या ठरावाच्या नकला वरिष्ठांना देण्यात आल्या. त्यामुळेच विधानपरिषदेचे तिकीट मिळाले, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ठरावा प्रमाणे मी मागणी केली. मात्र निवडणुका राज्यसभेच्या लागल्या. बैठकीत मागणी केल्यावर मी उठून आलो. कारण मला विधानपरिषदेचे तिकीट हवे होते. हैवही जायच आणि दैवही जायच म्हणून चार दिवसांनी पुन्हा गेलो. मी तयार झालो. मी राज्यसभा निवडणूक लढायचीही तयारी दाखविली. 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरला. दुपारी कळाले की अवघड आहे. इंडिकेटर लागले. तात्काळ ज्यांना संपर्क करायचा तो केला. ही सिक्रेट गोष्ट असल्याने ओपन करत नाही. त्याच दिवशी विधानपरिषदेचा शब्द पक्का झाला. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज माघारी झाला आणि विधानपरिषदेचे तिकीट मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी अर्ज भरल्यावर व निवडणूक जिंकल्यावर कर्जत-जामखेड मतदार संघात मिरवणूक काढण्यात आली. 2019 ला एक्सिडंट झाल्याने निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांना जल्लोष करता आला नव्हता. ती कसर त्यांनी आता भरून काढली. राज्यसभा निवडणुकीत विरोधकांना पहिला डोस दिला. विधानपरिषद निवडणुकीत दुसरा डोस दिला. आता भाजप बुस्टर डोस देणार आहे, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीला दिला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळे गुवाहाटी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अनैतिकपणे आलेले आहे. त्यामुळे सत्ता येताच कोविडमुळे दोन वर्षे पंढरपूरच्या मंदिरात पूजा झाली नाही. वारकरीही पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. या सरकारचे माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकी सर्व गुवाहाटी झाले आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री त्याचे सर्वजण फुटले. पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद असलेल्या पक्षाला वाटलेली खाती मित्र पक्षाला द्यावी लागली. आता कळले असेल भाजपने विधानपरिषदेला सहाव्या उमेदवाराचा अर्ज का भरला असेल. देवेंद्र फडणवीस यांचे काटोकोर नियोजन व सुक्ष्म नियोजन होते. त्यामुळे बहुमत असलेल्या पक्षाचे उमेदवारही पराभूत झाले. फडणवीस काहीही करू शकतात, हा संदेश लोकांत गेला. राज्यातील आमदारांच्या भावना बदलल्या. नीतीमत्तेने केलेल्या कामाने सत्ता येते. महाविकास आघाडी सरकार अनैतिक होते. म्हणून त्यांची सत्ता जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोणी माझा पायगुण चांगला म्हणत आहेत मात्र काही जण जेवायला बसले तर बुंदीचे ताट उडाले अशी स्थिती झाली आहे. जे भाजपमधून नुकतेच गेले ते आता पस्तावत आहेत. त्यांची आता आम्ही मजा पाहतो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT