Adinath Sugar Factory
Adinath Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रश्मी बागल मुख्यमंत्र्यांचा सल्ला मानणार का?...विरोधक नारायण पाटलांशी जुळवून घेणार काय?

​अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath sugar Factory) मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांना आदिनाथ कारखान्याप्रमाणेच भविष्यातही एकत्रितपणे काम करा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा सल्ला दिला. आता रश्मी बागल मुख्यमंत्री शिंदे यांचा सल्ला मानून कट्टर विरोधक माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्याबरोबर जुळवून घेणार का, अशी चर्चा करमाळ्याच्या राजकारणात रंगली आहे. (Will Rashmi Bagal implement the Chief Minister's advice?)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून रश्मी बागल यांनी धनुष्यबाणावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र. शिवसेनेत फूट पडल्यापासून रश्मी बागल या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटापासून सुरक्षित अंतरावर आहेत.  त्यांनी अद्याप आपण कोणत्या गटाबरोबर आहोत, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आदिनाथ कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल म्हणाल्या की, बागलांनी आदिनाथ कारखाना विकला, असा आमच्यावर आरोप केला जातो आहे. पण, जेवढे कर्ज होते, तेवढी साखर कारखान्याकडे पडून होती. ती साखर उचलू दिली नाही,  त्यामुळे कारवाई झाली. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत यांनी आम्हाला कोणत्याही शब्दांत न बांधता मदत केली आहे. शेतकऱ्यांचे मंदिर असलेला हा कारखाना शेतकऱ्यांचा राहावा म्हणून मदत केलेली आहे. पंचायत समिती, झेडपी, आमदारकी, खासदारकी असा काहीही शब्द वापरला नाही आणि मदत केली. माजी आमदार नारायण पाटील व बागल गट फक्त आदिनाथ कारखान्यासाठी एकत्र आले आहेत. भविष्याचे आम्हाला माहित नाही. मात्र, कारखाना सुरु राहावा; म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी गोविंदबापू पाटील यांनी २२ वर्षे पायात चप्पल घातली नाही, याचा उल्लेख नारायण पाटील यांनी केला. अतिशय त्यागातून हा कारखाना उभा राहिला आहे. हा कारखाना सहकारीच राहावा, यासाठी आरोग्य मंत्री सावंत यांना सूचना दिल्या, त्या पद्धतीने त्यांनी कारखान्यात लक्ष घातले. रश्मी बागल यांच्या ‘आम्ही कारखान्यासाठी एकत्र आलो आहोत. भविष्याचे आम्हाला माहित नाही,’ या विधानाचा धागा पकडून शिंदे यांनी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र काम करावे, असे सूचित केले. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्र्यांचा हा सल्ला फक्त रश्मी बागलच नाही, तर नारायण पाटीलदेखील मानणार का? हा सध्या चर्चेचा विषय आहे.

राजकारणात प्रवेश केल्यापासून रश्मी बागल या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून करमाळा विधानसभा शिवसेनेकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. रश्मी बागल यांनी अद्यापही आपण कोणत्या गटात आहोत, याविषयी भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांचे सावंतांबरोबर चांगले संबंध आहेत. रश्मी बागल यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत नेऊन २०१९ मध्ये शिवसेनेची उमेदवारी देण्यासाठी सावंत यांनी मातोश्री दरबारी मोठे वजन वापरले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यापासून राजकारणात रश्मी बागल यांची भूमिका काय असणार, याबाबत अद्याप त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही.

रश्मीदीदी मी आपणाला सांगू इच्छितो...

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने  तुम्ही एकत्र आलेला आहात,  रश्मीदीदी, मी आपणाला सांगू इच्छितो, भविष्यामध्येदेखील या करमाळ्याच्या विकासासाठी आपण (नारायण पाटील आणि रश्मी बागल) एकत्र राहा. एकदिलाने काम करा, तानाजीराव सावंत, मी स्वतः, सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT