Dilip Kolhe-Vidya Lolge
Dilip Kolhe-Vidya Lolge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे भाऊबीजेला दिलीप कोल्हेंकडे मागणार ‘ही’ ओवाळणी!

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर (Solapur) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) हे आपले शेकडो कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे (Vidya Lolge) यांना ‘कोल्हे हे पक्ष सोडून जाणार नाहीत,’ असा विश्वास आजही वाटतो. भाऊबीजेच्या ओवाळणीला आपण कोल्हे यांची मनधरणी करून राष्ट्रवादी न सोडण्याची ओवाळणी घेणार असल्याचे लोलगे यांनी स्पष्ट केले. (Will try to ensure that Dilip Kolhe does not leave NCP : Vidya Lolge)

कोल्हे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. पण, राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांना अजूनही ते निर्णय बदलतील असा विश्वास वाटतो. भाऊबीजेच्या वेळी ओवळणीला आपण दिलीप कोल्हेंची मनधरणी करुन त्यांना शिंदे गटात जाण्यापासून रोखू, असं लोलगे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप कोल्हेंना भरपूर काही दिलं आहे. राष्ट्रवादीने त्यांना उपमहापौरपद दिलं, तीन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आले. स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून घेतलं. या शिवाय त्यांच्या पत्नीही एकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत, अशी आठवण लोलगे यांनी करुन दिली.

लोलगे म्हणाल्या की, दिलीप कोल्हे यांचा मला बहीण म्हणून अभिमान वाटतो. त्यांच्या मनात जी काही खदखद आहे, जे टोचलं गेलं आहे. ते त्यांनी कधीही चव्हाट्यावर आणलेलं नाही. मीडियासमोर ते काहीही बोलले नाहीत. ते म्हणतात की, मी का चाललो आहे, ते तुम्ही वरिष्ठांनाच विचारा. कोल्हे यांच्या नाराजीची दखल पक्षाने घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबातील हा वाद आहे, तो आम्ही कुटुंबातच सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. दिवाळीनंतर सोलापूर शहरातील नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन कोल्हे यांची नाराजी त्यांच्या कानावर घालणार आहोत.

दिलीप कोल्हे नाराज नक्कीच आहेत. पण ते पक्ष सोडून जातील, असे मला वाटत नाही. कार्यकर्त्याच्या जिवावर पक्ष मोठा आहे. कोल्हे यांचे कार्यकर्तेच त्यांना इतर पक्षात जाऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा सोडून कोल्हे इतर ठिकाणी जाणार नाहीत. त्यांची पक्षात मानहानी झाली असेल. पण त्यांना पक्षानेही भरपूर दिलं आहे, असेही लोलगे यांनी स्पष्ट केले.

नवीन लोकांमुळे दिलीप कोल्हे पक्ष सोडून जाणार नाहीत. नवीन लोक पक्षात येतच राहणार. हा वाढता प्रवाह पक्षात पाहिजे, म्हणजे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण मानलं जातं. नवीन लोकांना आपल्यात समाविष्ठ करून घेतलं पाहिजे. आम्ही फक्त जुनेच पक्ष चालविणार आणि पुढे पुढे राहणार तर तसे चालत नाही. नव्या लोकांमुळं पक्षसंघटना वाढत असते, असा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले की, तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांचा त्यांच्यावर अधिकार आहे. सावंत आणि कोल्हे यांची पहिल्यापासून ओळख आहे, त्यामुळे कोल्हे सावंत यांच्याकडे गेले असतील. पण, कोल्हे लगेच शिंदे गटात प्रवेश करणार, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. भाऊबीजेच्या दिवशी मी दिलीप कोल्हे यांना गळ घालणार आहे. तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका. पक्षाला तुमची गरज आहे. ते पक्ष सोडून जाणे, राष्ट्रवादीला कदापि परवडणारे नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT