Yashwantrao Gadakh & Rukma Gadakh
Yashwantrao Gadakh & Rukma Gadakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

यशवंतराव गडाखांनी नातीला दिला सुखी संसाराचा कानमंत्र

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : सध्याच्या युगात विवाह जुळविणारे मध्यस्थी दुर्मिळ झाल्याने नववधू नवीन अपरिचित माणसं व नवीन घरी नांदण्यास जाणे म्हणजे मोठी अग्निपरीक्षा समजत असतात. आता कसं होणार आणि काय होणार या चक्रव्युहात असलेल्या अनेक तरुणींना उपयोगी पडेल असा मौलिक सल्ला माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी आपल्या नातीला दिला. हा कानमंत्राचा आजोबा-नातीतील संवाद युवानेते सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी सोशलमीडिया टाकलेला व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. Yashwantrao Gadakh gave the mantra of happy world to his Granddaughter

सत्यजित तांबे यांनी जयहिंद युवा मंच, संगमनेरच्या माध्यमातून "युवकांच्या यशोगाथा" हा टॉक-शो सुरु केला आहे. त्यांनी पहिला शो राहाता (जि. अहमदनगर) येथील निखील सदाफळ यांचा केला असुन यामध्ये सदाफळ याने अमेरिकेत हॉटेल व्यावसायात कसे यश मिळविले ते सांगितले आहे. तांबे यांनी काल (सोमवारी) रोजी यशवंतराव गडाख व त्यांची नात रुकमा विजय गडाख यांच्यातील संवाद प्रसिद्ध केला आहे.

यशोगाथामध्ये उद्योजक विजय यशवंतराव गडाख यांची कन्या रुकमा आजोबांना म्हणते," आप्पासाहेब, माझ्या लग्नाच्या विषयाने मी पूर्ण गोंधळून गेले आहे. काय केलं पाहिजे मला काही समजत नाही. तुम्ही मला काही सांगा ना.."

रुकमा हिने विचारलेला प्रश्न आज हजारो मुलींना पडलेला आहे. लहानाची मोठी ज्या घरात झाली ते घर सोडून परक्या घरी जाण्याचे मोठे आव्हान असते. तेथील वातावरण, परिस्थिती, स्वभाव सारंच नवीन असल्याने मुली खरोखर तणावात असतात.

रुकमा हिने विचारलेल्या प्रश्नांवर ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले, " तू सर्वात अगोदर पतीच्या मनात मन गुंतून दोघांची मन जुळवून घे. तेथे दोन्ही घरातील संस्कार एकत्र करुन वागली की सासू, सासरे व इतर आपलेसे होतात. स्रिशक्तीपणा तू कशा पध्दतीने वापरते यावर संसाराचा गाडा असल्याने सर्वाचे मन जिंकण्याला महत्व दे. पुरुष हा घरचा पाहुणा असतो. त्यामुळे घराला घरपण देणे महिलेच्याच हातात असते. हे विसरु नको, असे सांगून गडाख यांनी संसारात कुरबूर, रुसवा-फुगवा होतच असतो त्यावर रडत,कुढत बसू नको. नेहमीच घरात राहुन एकमेकांना जाणुन घेता येत नाही.याकरीता वर्ष,दोन वर्षातून निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जा कारण घराच्या चार भिंतीपेक्षा प्रवासात एकमेकांची मन घट्ट जुळतात. आयुष्य हे एकदाच आहे ही जाणीव कायम मनात ठेवली की जाणिवा दिव्याप्रमाणे तेजोमय होवून होणार संसार नक्कीच सुखीसंसार होईल, असेही गडाखांनी आपल्या नातीला सांगितले.

आजोबाने नातीला दिलेला सुखी संसाराचा कानमंत्र जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे मावस मेव्हणे सत्यजित तांबे यांनी "युवकांच्या यशोगाथा" मध्ये घेवून खरोखर उपवर वधूंसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सोशलमीडियावर या पोस्टचे जोरदार स्वागत झाल्याचे युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित लुणीया यांनी सांगितले.

हा संवाद ऐकून संसारात पाऊल टाकणारी मुलगी खरोखर जाणाऱ्या घरात लक्ष्मीचं पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया युवा कलावंत अभिषेक बारहाते याने दिली.

मी अनेक सभा, मेळावे व सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र कुटुंब पद्धतीबाबत सांगत आलो आहे. ज्यांच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहता त्या खांद्याला विसरू नका. वयोवृद्धांचे हाल होवू नये एवढाच हेतू होता. आता गोंधळात पडलेल्या नातीला दोन शब्द सांगताना माझ्या समोर सर्व समाजातील मुली आहेत हे समजूनच दोन शब्द सांगितले आहेत. मोबाईल व टीव्ही वरील मालिकेमुळे कौटुंबिक संवाद हरपला आहे. तो संवाद घडवा कुटुंब आनंदात राहील.

- यशवंतराव गडाख, माजी खासदार व जेष्ठ साहित्यिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT