Pune News: महाराष्ट्रातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारण तापू लागले आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस उरले असतानाच उमेदवारीबाबतचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे. एकीकडे विधान परिषदेच्या आमदारकीसाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांची भाजपमध्ये मोठी रांग असताना पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं विधान परिषदेची संधी नाकारली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव भाजपच्या वाट्याला येत असलेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचंही नाव भाजपच्या गोटातून पुढे आले होते. मात्र, आपण आत्ता पक्षामध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक नाही. आपल्याला संधी नको आहे, असे व्यक्तिगत मत आपण प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच दिली आहे.
विधानसभेतील सध्याचे भाजपचे एकूण संख्याबळ पाहता भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, पक्षाकडे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 च्या निवडणुकीत इच्छुकांच्या यादीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यांच्यासोबत भाजपच्या विधान परिषद उमेदवारांच्या संभाव्य यादीत केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक यांच्यासोबत निंबाळकर अशी काही नावं आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.
रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एक प्रमुख भाजप नेते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला समजले जाणाऱ्या माढा मतदारसंघात कमळ फुलवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. फलटणच्या ऐतिहासिक नाईक-निंबाळकर घराण्याशी त्यांचा संबंध आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी पराभव केला होता.
विधान परिषद निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. विधानसभेत सध्या भाजप (131), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40) हे एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.