Jay Pawar: राज्याचा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती इथं विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अनैसर्गिक मृत्यू असला तरी त्यात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. तसंच घातपाताबाबत्या संशयावर त्यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेलं विमान व्हीएसआर कंपनीचं होतं. या कंपनीचा मालक रोहित सिंग याला याप्रकरणी अटक व्हावी, असं जय पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर आपण बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट् केलं. एखादी बिल्डिंग पडली तर या बिल्डिंगच्या मालकाला अटक केली जाते. त्यांच्या इंजिनिअर्सना नाही. एखाद्या रेस्तराँला जर आग लागली तर रेस्तराँच्या मालकाला अटक करतात, त्यामुळं जर असा अपघात झाला तर त्यांच्यावर अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही, हीच माझी मागणी आहे.