धनंजय मुंडे यांना पाठींबा देणार्या नामदेव शास्त्री यांच्यावर भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. सदाभाऊ यांनी ट्विट करत म्हटले आहे की,भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी संत तुकोबांची ही वाणी गाव गाड्याला बळ देऊन जाई. इंडिया वादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मीक करून गेले.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, मोदी सरकार सामान्य भारतीयांसोबत भक्कमपणे उभे आहे, याचे हे प्रमाण आहे. आज जाहीर झालेल्या योजना व तरतुदी भारताच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत. भारत जगावर स्वार होईल, इतकी भक्कम तटबंदी करण्यात आली आहे. विरोधक करत असलेल्या टीकेला फारसे महत्त्व नाही.
लाच प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. दीड लाख घेताना अटक झालेला लिपिक प्रशांत धिवर याने खुलासा करतफक्त माझ्यासाठी नाही या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी मागितले होते पैसे.प्रशांत धिवर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी.
संभाजीनगर शहराजवळील वाळूज येथे एका खाजगी कंपनीत फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडिया कंपनीचे धान्य वेगळ्या पोत्यात भरून त्यावर खाजगी कंपनीचे लेबल लावण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकत शेकडो सरकारी धान्याची पोती जप्त केली आहेत. गरोदर मातांना दिल्या जाणारे पोषण आहारातील अन्न पाकिट सुद्धा या ठिकाणी आढळून आले आहेत.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मी आणि गावकरी लवकरच भगवान गडावर जाऊन वस्तुस्थिती सांगू, सगळे पुरावे देऊ, असे म्हटले आहे. देशमुख कुटुंबाची जबाबदारी भगवान गड घेईल, या शास्त्री यांच्या विधानावर आम्हाला भगवान गडाची मदत नको, न्याय हवा, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
मुंबईतील बीकेसी परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आहे. या आगीत तीन ते चार दुकाना जळून भस्मसात झाल्याची माहिती आहे. आगीचे लोळ उठले असून अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक जवानांना यश आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याचे बजेट कधी सादर करणार याबद्दल भाष्य केले. मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात बजेट सादर करणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा तसेच माझ्या लाडक्या बहिणी, तरुण तरुणींचाही विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आपल्याला आनंदच होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे विधान केले होते. यावरून भाजप-शिवसेनेच गदारोळ सुरु झाल्यानंतर आता संजय शिरसाट यांनी घुमजाव केले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येणे आता शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असे समजण्याचे काहीच कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय शिरसाट दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे आणि प्रयत्न करणार असे म्हणत असतील, तर त्यांनी हा विचार अगोदर का केला नाही? शिवसेना दोन विभागात का विभागली गेली. फुटायच्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मन मोकळेपणाने बोलले असते तर त्यांनी ऐकले असते. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळे होऊ शकले नाही. मात्र भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. आता भाजप यांना वेगळे करण्याची भीती आहे म्हणून ते सर्व या गोष्टी बोलत असतील आणि तशी गुगली टाकत असतील. संजय शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलावं आणि त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावं ते ठरवतील काय करायचं, ते अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या कुंभमेळा सुरू असून लाखो भाविक प्रयागराजमध्ये पवित्र स्नानासाठी जात आहेत. अशातच अमरावतीच्या 450 भाविकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर कुंभमेळाव्याला नेतो म्हणून आमदार रवी राणा यांच्या सुरज मिश्रा या कार्यकर्त्याने पैसे उकळल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. तर कुंभमेळाव्याला नेतो म्हणून सहा हजार रुपये मिश्राने उकळल्याचा आरोप केला जातोय.
सोलापुरमधील भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच ते थेट मातोश्रीवर पोहचले आहेत. यामुळे राज्यात चर्चांना उधान आले असून आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुथ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल तासभर चर्चा झाली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांची मागणी शेतीच्या अवजारावरील जीएसटी कमी करण्याची असताना ती देखील या अर्थसंकल्पामध्ये मान्य करण्यात आलेली नाही. जीएसटी कमी झालेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे त्याची पूर्तता अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं बजेट विकसित भारताचे स्वप्न साकारणारे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा जनतेला काय अपेक्षित आहे ते महत्वाचे असल्याचे म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिल्याचा घणाघात किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केला आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्यातील बहुतांशी घोषणा सुद्धा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या असल्याचा दावा नवले यांनी केला आहे.
या बजेटमध्ये आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारसाठी विशेष घोषणा करण्यात आली. येथे मखाना उत्पादन बोर्डाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र चंद्राबाबू नायडू पॅकेज घेऊन निघून गेले. पण नीतिश कुमार बिहारसाठी काहीच मिळवू शकले नाहीत अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.
आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तर हे बजेट सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारं असून त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांना दिलासा म्हणत 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. याच घोषणेवरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीक केली आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी, जर पगार नसेल तर? उत्पन्न कुठून येणार? तुम्हाला करातून दिलासा मिळवण्यासाठी नोकरी असणं गरजेचे असल्याचा टोला लगावला आहे. तर अर्थसंकल्प सादर करताना बेरोजगारीचा उल्लेख देखील सीतारामन यांनी केला नाही, असा आरोप थरूर यांनी केला आहे.
शिक्षण, आरेाग्य क्षेत्रासाठी मोठ्या कल्पना मांडलेल्या नाहीत. कृषी क्षेत्रासाठी नेहमीप्रमाणे तोंड भरून कौतुक केले आहे. शेतकऱ्यांची सर्वांत महत्वाची मागणी आहे, ती म्हणजे पिकांच्या हमीभावाच्या कायद्याबाबत सरकार बोलायला तयार नाही. राज्यात आजही दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण-तरुणी आणि सर्वसामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थसंकल्प सादर करणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरांत लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केला आहे.
अपेक्षापेक्षा अधिक इनकम टॅक्सची मर्यादा वाढवली आहे. बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. नव्या कर प्रणालीचा मोठा फायदा मध्यमवर्ग, नोकरदारांना आणि नवतरुणांना होणार आहे. मोठे इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात होणार आहे, तो पैसा खर्च केल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात होणार असून त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इनकम टॅक्सची मर्यादा वाढविण्सांदर्भात धीराने घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील. चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील. सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील कस्टम ड्युटी १५ वरून ५ पर्यंत कमी करण्यात आली.
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण यांनी स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे.
अर्थसंकल्प सुरु होताच सपा खासदार अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. निर्मला सीतारमण या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण वाचत असतानाच सपा खासदारांनी सभात्याग केला आहे.
अर्थसंकल्पात गरीब शेतकरी, महिला आणि तरुणांच्या दिलासा मिळणार का?
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज जखमींना भेटण्यासाठी प्रयागराजला जाणार.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यातील अनेक मंत्री, जगातील 73 देशांतील सुमारे 116 राजदूत आणि प्रतिनिधी शनिवारी महाकुंभ मेळा परिसरात दाखल होत आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कथित कट प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
गेल्या दहा वर्षांत लक्ष्मी भाजपवाल्यांना प्रसन्न झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडवणाऱ्याच योजना सरकारने आणल्या आहेत. दहा वर्षांत लक्ष्मी गौतम अदानींवर प्रसन्न आहे. मोदी जेव्हा घोषणा करतात, तेव्हा सामान्यांच्या पोटात भीताचा गोळा येतो, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाच दिवस राहिले असतानाच, सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी राजीनामे दिले. पक्षाच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला असून, प्रमाणिक विचारसरणीपासून पक्ष दूर जात असल्याचे कारण देत आमदारांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने मात्र राजीनामा देणाऱ्या आमदारांचे आरोप फेटाळले आहेत.
अभिभाषण वाचता वाचता राष्ट्रपती अखेरीस खूप थकल्या होत्या. त्यांना बिचाऱ्यांना बोलताही येत नव्हते, अशी टिप्पणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणानंतर केली. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वादंग झाला आहे. 'बिचाऱ्या' या शब्दावरून सत्ताधारी भाजपने सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून, संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार आहे. त्यातून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी यांनी सांगितले.
आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यातील दर कपातीनुसार कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 20 रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजपासून रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला आहे. त्यानुसार आजपासून रिक्षाचे भाडे किमान 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असे असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आठवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.