बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज सीआयडी, एसआयटी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर मीडियाला प्रतिक्रिया देताना कुणालाही सोडणार नाही, असं आम्हाला सांगितलं गेलं, असं धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.
मोठी राजकीय बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार आहे. शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त होणार आहे.पालिका निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करणारे बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी फोन केला होता. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करताना जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्याचसोबतच आतापर्यंत झालेल्या तपास कामांचा आढावादेखील यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. अधिकारी आणि देशमुख कुटुंबियांमध्ये काही मिनिटांपासून चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठी माहिती दिली आहे.ते म्हणाले, आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकार्यांच्या संपर्कात होते असाही आरोप देशमुख कुटुंबाकडून करण्यात आला होता.त्याचमुळे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती धस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सामाजिक न्यायमंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.शिरसाटांनी आता सिडकोची घरं घेण्यासाठी 'डोमिसाईल' सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्राची अट कशाला हवी असा सवाल उपस्थित केला आहे. ती अट दूर करण्याच्या विचार आपण आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, शिरसाटांच्या निर्णयामागची भावना चांगली असली तरी परप्रांतियांना या निर्णयाचा अधिक लाभ मिळण्याची चर्चा आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.कारण वाल्मिक कराडंनं अवैध मार्गानं मिळवलेला पैसा रियल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीसोबतच आता ईडीची देखील इन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे.
“संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी, एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाहीत. कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली जाणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालवल्याचे समजते. सोमवारी त्या घरात कुटुंबीयांसोबत बसल्या असताना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना केज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटे चर्चा झाली. यावेळी राजकारणातील सध्य परिस्थितीवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. यावेळी महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावाबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली
बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करणारे बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. तपासात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या. त्यासोबतच आतापर्यंत झालेल्या तपास कामांचा आढावा त्यांनी घेतला.
सरपंच देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला खंडणी प्रकरणातील पंधरा दिवसाच्या कोठडी होती तसेच खून प्रकरणात दोन दिवसांची कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपली असल्याने आज (सोमवारी) पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विष्णू चाटे याला न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणारी कामाचा आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
वेळेत गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता. वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणात त्यांना सहआरोपी करत त्यांच्यावर मकोका लावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीला कार्यालयच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर समितीचे कार्यालय होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांन देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयाविनाच शिंदे समितीला काम करावे लागणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्या मिळावा म्हणून त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन केले. जरांगेंच्या मध्यस्थीने हे आंदोलन धनंजय देशमुख यांनी चार तासांनी मागे घेतले. त्यावेळी मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टार्गेट केले. मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडायला लागला आहे. जोपर्यंत तुमचे पाऊल चुकीच पडत नव्हते तेव्हा समाज शांत होता. एकही आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीच जगणं मुश्किल करू, असा थेट इशाराचा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा. ज्यावर खंडणीचा आरोपी आहे त्यांच्यावर मोक्का लावला. फडणवीस तुमचे सरकार खंडणीखोर चालवत आहे का? खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहे. जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर राज्य एका खटक्यात बंद करेल, असे इशारा मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे
धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यावेळेत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संपूर्ण गाव आंदोलन करणार, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.
भावाला न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी विश्वासघात करू नये, असे देशमुख यांनी म्हटले आहे. तपासाची माहिती दिली जात नाही. न्याय मागणाऱ्यांवरच कारवाई केली, असा संताप देशमुख यांनी व्यक्त केला.
CID चे अधिकारी काही वेळातच मस्साजोगमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली. धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आता सीआयडीचे अधिकारी देशमुख यांच्याशी आज चर्चा करतील.
धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले असून आता सर्व गावातील नागरिक एका ठिकाणी जमा झाले आहेत. याठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला वेग यावा, यासाठी यापुढे काय भूमिका घ्यायची, याबाबत चर्चा सुरू असावी, अशी प्राथमिक माहिती आहे.
धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर खाली उतरले आहेत. त्यांनी खाली येताच मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून टाहो फोडला. जरांगे पाटील यांनी त्यांना आधार दिला. यावेळी इतर ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. त्यानंतर मीडियाशी बोलताना धनंजय देशमुख यांनी माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली.
पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणारे धनंजय देशमुख यांनी अखेर आंदोलन मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने त्यांची मनधरणी केली. त्याला यश आले आहे. यावेळी पोलिस अधिक्षकही उपस्थित होते. धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले आहेत.
प्रशासनाने दक्षता म्हणून अग्निशमन दलाची गाडी आणण्यात आली आहे. दलाच्या जवानांनी टाकीच्या खाली जाळी लावल्याचे समजते. देशमुख यांनी टाकीवरून उडी मारली ते सुरक्षित राहावेत, असा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्या तेथील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला जात आहे. त्यांना टाकीवर खाली येण्याची सातत्याने विनवणी केली जात आहे. पण देशमुख ऐकायला तयार नाहीत. ते आंदोलनावर ठाम आहेत. वाल्मिक करावरही खूनाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
संतोष देशमुख यांची मुलगी व धनंजय देशमुख यांची पुतणीही पाण्याच्या टाकीवर आहे. टाकीच्या पायऱ्यांवर गावातील इतर महिला व ग्रामस्थांसह त्या उभ्या आहेत. आंदोलनामध्ये गावातील सर्व नागरिक, महिला सहभागी झाल्या आहेत.
धनंजय देशमुख आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी महिला पोलिस अधिकारी जवळच्या दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढल्या आहेत. तिथून त्या देशमुखांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. सध्या गावामध्ये पोलिस अधिक्षकही दाखल झाले आहेत. त्यांनी फोनवरून देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आता देशमुख यांची समजूत कशी काढायची, असा प्रश्न निर्माण झाला असून ते आंदोलनावर ठाम आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीची तयारी जोरदार सुरु केली आहे. मुंबईत शिवसेना शिंदेंच्या पक्षाची आज रंगशारदाला 5 वा महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या अनुशंगाने चर्चा होणार आहे. शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. भाजप पाठोपाठ महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेही कंबर कसल्याचं पहायला मिळत आहे...
संतोष देशमुख प्रकरण चांगलंचं पेटलं आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी धनंजय देशमुख यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून देशमुखांनी आंदोलन केले आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुखांना फोन करून संवाद साधला. तुम्ही पाण्याच्या टाकीवरून खाली या, मी तुमच्या सोबत आहे. आम्ही सरकारचं जगणं मुश्किल करू असं विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
लक्ष्मण हाके यांना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी जरांगे यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आला आहे. पत्रकार परिषदापूर्वी फोनहून अरेरावी करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आज मस्साजोगमध्ये मोबाईल टाॅवरवर चढून आंदोलन करणार होते. पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त वाढविला होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करण्यात येणाऱ्या तपासा विषयी विचारपूस केली. आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहोत असा शब्द आनंदराज आंबेडकरांनी यावेळी दिला.
येत्या पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत आहेत. महायुतीच्या 237 आमदारांची बैठक त्यांनी बोलावली आहे. त्यात ते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्यांदाच ते एखाद्या राज्यातील आमदारांशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. मोदी महायुतीच्या आमदारांशी कशी याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर रविवारी संध्याकाळी साडेसात- आठच्या सुमारास पुढे चाललेल्या सळईच्या ट्रकमध्ये मागून भरधाव आलेला टेम्पो थेट घुसला. पुढच्या ट्रकमधील बाहेर असलेल्या सळई घुसून पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धुळ्याकडून नाशिकमध्ये उतरणाऱ्या रॅम्पच्या पुढे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी पाथर्डी फाटा, सह्याद्रीनगर (सिडको) येथील आहेत.
आज 11 वाजता मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
इंडिया आघाडी लोकसभेसाठी स्थापन झाल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी, ओमर अब्दुल्ला यांच्या मताशी आपण सहमत नसून इंडिया निश्चितच एक मजबूत आघाडी आहे. लोकसभेसाठी ती उभारण्यात आली आणि आम्ही चांगले लढलो. परंतु त्यानंतर इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झाली नाही, हे दुर्दैवी आहे. काँग्रेस आघाडीतील मोठा पक्ष असल्याने ती जबाबदारी काँग्रेसची आहे. येत्या काळात जर आपल्याला युती वाचवायची असेल किंवा ती अधिक मजबूत करायची असेल तर सर्वप्रथम संवाद आवश्यक असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रयागराज येथे कुंभ मेळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 60 लाख नागरिकांनी पवित्र स्नान केले असून सकाळी 5 वाजून 03 वाजेचा पवित्र स्नानाचा मुहूर्त होता. या कुंभ मेळ्यात एकूण 6 स्नान असणार असून यापैकी पाहिले स्नान आज झाले.
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला, आमदाराचा नामदार झाला, रायगडचा पालकमंत्रीही व्हावा, अशी रायगडकरांची इच्छा आहे. पण जे ईश्वराला प्रिय आहे तेच होईल. काही चांगलं घडायचं असेल तर जरा वेळ लागतो असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे. गोगावले यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. ते अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळ गावी गेले आहेत. तिथं ते आपल्या मूळ गावासह पुनावळे भागातील पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11 वाजल्यानंतर या आढाव्याला सुरवात होईल.
आमदार होऊन आता कंटाळलोय, आता मला मंत्री व्हावं वाटतंय, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. मंत्री कसा काम करतो हे दाखवून देण्यासाठी एकदा तरी मंत्री बनायचंय, अशी इच्छा रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी लाडक्या बहिणींना आता 1500 मिळत आहेत. 2100 मिळतील पण आपण 3000 मिळवून देवून असे वक्तव्यही आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
देशमुख हत्या आणि खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सीआयडीने तपासासाठी आपल्या ताब्यात देण्याची मागणी न्यायालयात केल्यामुळे केज न्यायालयाने दोन दिवसांसाठी त्याला सीआयडी कोठडी सुनावली होती. आज ही सीआयडी कोठडी संपत असल्यामुळे विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार आहे.
उरुसाच्या पहिल्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात भेट देत दर्शन घेतल्यानंतर आता पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी विशाळगडावर उरुसाच्या पार्श्वभूमीवर फौजफाटा तैनात केला आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली आहे.
महाकुंभ मेळाव्याला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी, भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी महाकुंभ मेळाव्यावा अतिशय खास दिवस आहे. महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू होत आहे, जो असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक असल्याचे PM मोदींनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबल यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. त्यांनी या योजनेत नियमांत न बसणाऱ्या महिलांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत. अन्यथा दंडासह पैसे वसूल करा असे म्हटले आहे.
‘स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. रविवारी (ता.१२) किल्ले विशाळगडला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळ्यास सुरुवात होत असून पहिल्या पर्वणी आहे. यानिमित्ताने त्रिवेणी संगमात मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करत आहेत.
संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. दरम्यान 11 वाजता मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मस्साजोग जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळाव्याची सुरुवात झाली आहे. देशभरातून लाखों भाविक हे प्रयागराजला जात आहे. अशातच जळगाव परिसरात ही घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरतहून प्रयागराजला जाणाऱ्य ताप्तीगंगा एक्सप्रेसवर जळगाव येथे अज्ञातांनी दगडफेक केल्याचे समजते. यात रेल्वेच्या काही डब्याच्या काचा फुटल्या आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आठ आरोपींना शनिवारी मोक्का लावला आहे. पण खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमक्यांचे सत्र सुरु झाले आहे. धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात आंदोलन पुकारण्याची भूमिका घेतली आहे.आज धनंजय देशमुख हे मोबाईलवर चढून आंदोलन करणार आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी टॉवरवरुन चढून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगाच्या ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याची पहिली पर्वणी आज (१३ जानेवारी २०२५) असून शेवटची पर्वणी दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी असणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे.या महा कुंभामध्ये देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत. येथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो. ४५ दिवस चालणारा हा कुंभमेळा केवळ आर्थिक, प्रशासकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपराही जगासमोर आणतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.