Supriya Sule-Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Supriya Sule criticizes Fadnavis : माफीनाम्याचा ढोंगीपणा बंद करा, काँग्रेस-राष्ट्रवादीने कधीच कंत्राटी पदे भरली नव्हती...

Jagdish Pansare

Maharashtra Political News : विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही घोषणा करताना कंत्राटी भरतीची परंपरा ही काॅंग्रेस-राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचा आरोप करत फडणवीसांनी आकडेवारीच मांडली. (NCP-BJP News) यावरून आज राज्यात कंत्राटी नोकरभरती या एकाच विषयावर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येऊन आंदोलन करताहेत.

सत्ताधारी कंत्राटी नोकरभरतीला महाविकास आघाडीच जबाबदार म्हणून निषेधासाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आमच्या आंदोलनामुळे कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द केल्याचे श्रेय घेत विजयोत्सव साजरा केला. (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत जीआर रद्द केल्याची घोषणा करताना वीस वर्षांपासून त्या त्या काळातील आघाडी आणि गेल्या अडीच वर्षांतील महाविकास आघाडी काळातील कंत्राटी नोकरभरतीची आकडेवारी मांडत हे याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी केली होती.

यावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत ढोंगीपणा बंद करा, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात कधीच कंत्राटी पद्धतीने कार्यकारी पदे भरली नाहीत, अशा शब्दांत सुनावले. या संदर्भात `एक्स` वर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी २०११ ते २०२१ च्या काळातील मंत्र्यांची यादीच दिली. तेव्हा मंत्री असलेले बहुतांश नेते आज सत्तेत आहेत, याची आठवणही सुप्रिया सुळे यांनी भाजपला (BJP) करून दिली. भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा...! माफीनामा...!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्त्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरू केली, याचा शोध भाजपाने जरूर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटितपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडायची खोड आहे .

उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे 'हवाबाण' सोडण्याची हिंमत केली नसती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ च्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही.

भाजपच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील, तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा, अशा शब्दांत सुळे यांनी भाजपवर पलटवार केला. २०११ तील सरकारमध्ये विजयकुमार गावित, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे मंत्री होते.

तर महाविकास आघाडीमध्ये याच मंत्र्यांसह एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे आणि आदिती तटकरे या मंत्र्यांसोबत तुम्ही सत्तेत आहात याची आठवणही सुळे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून फडणवीसांना करून दिली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT