Rajani Patil
Rajani Patil Sarkarnama
महाराष्ट्र

मला आज लहान भाऊ राजीव सातवांची आठवण येतेय : बिनविरोध निवडीनंतर रजनी पाटील भावूक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : याअगोदर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आता राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मलाच उमेदवारी मिळाली. या व्यक्तींच्या जागी वर्णी लागणे म्हणजे मोठी जबाबदारीच आहे. मला आज लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येत असल्याचे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांनी भावूक होत सांगितले. निवडणूक बिनविरोध झाल्याने पाटील यांनी भाजप नेत्यांचेही आभार मानले. (Today I remember my younger brother Rajiv Satav : Rajni Patil)

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पाटील आणि भाजपच्या संजय उपाध्याय यांनी अर्ज दाखल केले होते. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा आग्रह काँग्रेसचा होता; तरीही 'पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याचे सांगून माघार नाही, असे भाजप नेत्यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही ‘प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्य निर्णय घेतील’, असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे निवडणूक होणार का, याबाबत उत्सुकता होती. अखेर उपाध्याय यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पाटील यांना निवडीचे पत्र दिले. तेव्हा पाटील यांनी विधानभवनाबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरच्या निवडीचाही उल्लेख पाटील यांनी आर्वजून केला.

पाटील म्हणाल्या, "दिल्लीतून मला आशीर्वाद मिळाला, त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन मला राज्यसभेत काम करण्याची पुन्हा संधी दिली. याच स्थितीत भाजपनेही मनाचा मोठेपणा दाखवून निवडणूक बिनविरोध केली. त्यांचेही आभार मानते. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखविला. याआधी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. ही परंपरा काँग्रेसने जपली आहे."

‘‘पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मी अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसचे नेते दोन वेळा वरिष्ठांना भेटले. सर्व पातळ्यांवर चर्चा करूनच माघार घेतली आहे. अर्ज दाखल करण्याआधी आमची भूमिका वेगळी होती,’’ असे उपाध्याय यांनी सांगितले. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमधील सध्याचा राजकीय संघर्ष पाहता ही निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, परंपरा म्हणून पटोले आणि थोरात हे फडणवीस यांना भेटले. अन्य नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांत भाजपने अपेक्षित सहकार्य केल्याने काँग्रेस नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहे. अडचणीच्या काळात अशा प्रकारचे सहकार्य राहील, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT