Nana Patole, Balasaheb Thorat, Uddhav Thackeray
Nana Patole, Balasaheb Thorat, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: '' वाडा पडला तरी अहंकाराचा...''; थोरात-पटोले वादावरुन ठाकरे गटानं काँग्रेसचे टोचले कान

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray on Controversy in Congress : सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर नाना पटोलेंकडून तांबे पिता पुत्रांवर पक्षाचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यानंतर तांबेंनी विजयानंतर पटोलेंवर हल्लाबोल केला होता.

मात्र,या वादात सुरुवातीपासून मौन बाळगणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी आजारपणातृन सावरल्यानंतर तांबे- पटोले वादावरुन तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिलं. यावरच हे प्रकरण न थांबता त्यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला. थोरात पटोले प्रकरणामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं काँग्रेस पक्षाचे कान टोचले आहे.

ठाकरे गटानं सामनातील अग्रलेखाद्वारे थोरात पटोले वादावर परखड भाष्य करत काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतंय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचंच नुकसान होऊ शकतं असा धोक्याचा इशाराही दिला आहे.

सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते व थोरातांचे भाचे आहेत. तांबे-थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानित केले असा संताप बाळासाहेब थोरातां (Balasaheb Thorat)चा आहे व त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा अशी विचारणाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

तसेच थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे असा सल्लाही उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.

थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळ्यात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत. त्यांच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत.

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते असा टोलाही काँग्रेसला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यपध्दतीवर भाष्य करताना ते मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा घराण्यांशी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर २०२४ साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल.

नाहीतर २०२४ आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेस(Congress)च्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे असं एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेच आहे अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सावधानतेचा इशाराही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT