Ahilyanagar Municipal Corporation : उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनानंतर राज्यभरातील राजकीय विश्व कोलमडून पडले आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अजितदादांच्या समर्थकांनी फक्त हात जोडत मौन प्रचार सुरू केला आहे.
अजितदादांच्या निधनाचा दहावा दिवस, शुक्रवारी 6 फेब्रुवारीला येत असून, अहिल्यानगर शहराच्यादृष्टीने तो दिवस अधिक संवेदनशील असणार आहे. या दिवशी अहिल्यानगर महापालिकेचा महापौर निवडला जाणार आहे. या पदातून अजित पवार दादा राष्ट्रवादी पक्षाला राज्यभरात एकमेव महापौरपद मिळणार आहे. या पदाच्या माध्यमातून अजितदादांच्या आठवणी अहिल्यानगरकर जपणार का? हे पद भाजप घेणार की राष्ट्रवादी? असे प्रश्न शहराच्या राजकीय विश्वाच्या चर्चेत असून, याचा नैतिक दबाव आमदार संग्राम जगताप यांच्यावर वाढला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजितदादा राष्ट्रवादीने (NCP) सर्वाधिक 27 जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल 25 जागा भाजपने जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांतून महापौरपदाची तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना याबाबत फारशी काही माहिती नाही व त्यांचेही आडाखे बांधणे सुरू आहे.
भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपचे नेते व अजितदादा राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) या तिघांच्या स्तरावरच हा विषय एकवटला आहे. महापौरपदी कोणाची वर्णी लावायची याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या मुंबईतील वरिष्ठांच्या स्तरावर होईल, असेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपाचा दहावा महापौर कोण? याची उत्सुकता वाढली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यभरातील 29 महापालिकांपैकी फक्त अहिल्यानगर इथंच अजितदादा राष्ट्रवादीला महापौरपदाची संधी मिळण्याची आशा आहे. शिवाय, इथं सर्वाधिक 27 जागा निवडून आला असल्याने महापौरपदावर राष्ट्रवादी अजितदादा गटाचाच पहिला हक्क असणार आहे.
भाजपकडूनही राज्यात शक्य तिथं आपल्या पक्षाचा महापौर बसवण्याचे मनसुबे आहेत. या पार्श्वभूमीवर, अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या वातावरणात अहिल्यानगरला अजितदादा राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षे महापौरपदाची संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. पण त्यावर अंतिम निर्णय येत्या सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हेच घेणार असल्याचे सांगितले जाते.
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या शुक्रवारी 6 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, या पदावर कोणाची निवड होणार याचा अंदाज येत्या सोमवारी (2 फेब्रुवारी) येणार आहे. या दोन्ही पदांसाठीचे कोरे अर्ज घेण्यासाठीच्या 29 व 30 जानेवारी या दोन दिवसांच्या मुदतीत कोणीही अर्ज नेलेले नाहीत. सोमवारी 2 फेब्रुवारीलाच कोरे अर्ज घेण्याची व याच दिवशी सायंकाळी 5 पर्यंत तो भरून उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे या दिवशीच दोन्ही पदांचे उमेदवार कोण याचे चित्र स्पष्ट होईल, असे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.