Ahilyanagar former minister protest : राहुरीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपासून त्यांचे बेमुदत उपोषण सुरू असून, त्यांनी सलाईन लावण्याची विनंती देखील फेटाळली. मी काही मरत नाही, पण तो शिवद्रोही सापडला पाहिजे. महापुरुषांची विटंबना करणाऱ्याची माहिती देणाऱ्या शिवप्रेमींकडून एक लाख रुपये दिले जाईल, अशी घोषणाही तनपुरेंनी केली.
खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनस्थळी येत तनपुरेंची भेट घेतली. दरम्यान, तनपुरेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बुधवारी (ता. 16) व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन माजी मंत्री तनपुरे यांना परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, ते फोल ठरले.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनात 50 शिवप्रेमी बसले आहेत. पुतळा विटंबनेच्या घटनेला 20 दिवस झाले. घटना घडली त्यावेळी परदेशात होतो. राहुरीत आल्यावर खासदार लंके यांच्यासमवेत पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. उपोषणाचे निवेदन दिले. त्यानंतर चार दिवस झाले, तरी तपासात प्रगती दिसली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव घटनेनंतर 19व्या दिवशी उपोषणाला बसल्याचे सांगितले.
या घटनेनंतर दोन दिवसांनी पालकमंत्र्यांनी पोलिस (Police) व महसूल प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी, एका टप्प्यापर्यंत तपास झाला आहे. आरोपींच्या नावाचा उलगडा होतोय. परंतु काही शहानिशा करावी लागेल, असे सांगितले. मग तपास कशासाठी लांबवला जातोय? याचे कोडे पडायला लागले आहे. घटनेनंतर दंगलसदृश परिस्थिती होऊन जीवित, वित्तहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, असा आरोप देखील प्राजक्त तनपुरे यांनी केला.
आरोपी सापडले नाहीत. विलंब झाला. तर आरोपींचे मनोबल वाढेल. पुन्हा एखाद्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये. राहुरी शहर आणि तालुक्यात शांतता राहावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे. पालकमंत्र्यांना पोलिस ब्रिफिंग करून आरोपीचे नाव उलगडले आहे, असे सांगतात. तर 20 दिवस होऊनही आरोपींची नावे जाहीर होत नाहीत. संशयित म्हणून सुद्धा कुणाला ताब्यात घेतले जात नाही. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.
लोकशाही मार्गाने उपोषणावर ठाम आहे. ठोस काहीतरी हाती लागत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उद्या (बुधवारी) राहुरी शहर बंद राहणार आहे. पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. तपास सीआयडीकडे देण्याची गरज नाही. एक पोलिस अधिकारी, चार कॉन्स्टेबल तपास करीत आहेत. त्यांना आणखी मनुष्यबळ द्यावे, अशीही मागणी तनपुरे यांनी केली.
हिंदूंच्या व महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य नाही. त्यामुळे आत्मक्लेष म्हणून उपोषण करीत आहे. सरकारने जागे व्हावे. आरोपींना अटक करावी, अन्यथा राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.