Sujay Vikhe Patil, Kiran Kale  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : विखे पिता-पुत्रांची थेट PMOकडून कानउघाडणी? नगरच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर सीना नदीवरील पुलाचे उदघाटन केले. या वेळी त्यांनी त्यांच्यावर सतत टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यात नगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावरदेखील खासदार विखेंनी नाव न घेता टीका केली होती. या टीकेला किरण काळे यांनी विशषणे लावत प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार विखेंवर टीका करताना किरण काळे यांनी अकार्यक्षम, बोलघेवडा, अशी विशषणे लावली आहे. सत्ता एखाद्याच्या डोक्यात गेल्यावर जनता त्याला घरचा रस्ता दाखवते. दक्षिणेला आजवरचा इतिहासातील सर्वात अकार्यक्षम आणि बोलघेवडा खासदार मिळाला आहे. मतदार ही चूक येत्या निवडणुकीत दुरुस्त करतील. युवराज खासदारांना येत्या निवडणुकीच्या मैदानात एखादा सर्वसामान्य, प्रामाणिक, साधा कार्यकर्तादेखील चारी मुंड्या चित करेल. त्यामुळे शंभर बोकडं कापली म्हणून कोणी पुन्हा खासदार होत नसतो, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.

काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचा संवाद मेळाव्यात किरण काळे यांनी खासदार विखेंचे नाव न घेता टीका केली. माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, माजी नगरसेवक संजय झिंजे, काँग्रेस सचिव रोहिदास भालेराव, सुजित क्षेत्रे, अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे उपस्थित होते.

जिल्हा आयुष्य रुग्णालयाची काँग्रेसने इन-कॅमेरा पोलखोल केल्यावरून किरण काळे यांच्यावर नाव न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार काळे यांनी घेतला. नगर शहरात झालेल्या एका कार्यक्रमात फराळ कार्यक्रमांनी जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार एक 'हलवाई' असता, असे विधान खासदार विखेंनी केले होते. किरण काळे म्हणाले की, "खासदार म्हणतात की, जेवढे लोक दहा फराळात होते, ते माझे तिखट खायलासुद्धा येणार. त्यांचा गैरसमज झाला असावा की, लोक त्यांच्या तिखटावाचून उपाशी आहेत. म्हणूनच शंभर बोकडांपैकी पन्नास-साठ बोकडाचं मटण फेकून द्यायची त्यांच्यावर वेळ आली. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या आवतनाला प्रतिसाद दिला नाही. माणूस फराळ, बोकड खाऊ घातल्याने मोठा होत नाही. तर जनतेची सेवा, विकासकामे केल्याने मोठा होतो. हे त्यांनी लक्षात ठेवावे".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल राठोडांना फसवणले...

किरण काळे यांनी खासदारांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. नगर शहरातील दहशत संपवण्यासाठी मला खासदार करा, असे ते म्हणाले होते. मात्र, दहशत करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून ते आता बसले आहेत. निवडणुकीत सेटिंग करून मतदारांना फसवले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिवंगत अनिल राठोड यांनादेखील त्यांनी फसवले. दक्षिणेतील नेत्यांच्या 30 वर्षांच्या कामांचा तुम्ही हिशोब मागत आहात. तुमच्या खोडीमुळे तालुके उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्याची नासाडी झाली. आता दहशतीला बळ देऊन तुम्ही नगर शहर नासवायला निघाले आहात. अवघ्या तीन वर्षांत उड्डाणपूल केल्याचा दावा ते करतात. पुलाचे खरे शिल्पकार कोण हे नगरकरांना माहीत आहे, असेही किरण काळे म्हणाले.

श्रीरामापेक्षा पंतप्रधान मोठे झाले का?

किरण काळे यांनी युवा खासदार म्हणतात की दुसरी दिवाळी 22 जानेवारीला देशात साजरी होईल. या वेळी प्रभू श्रीराम आपला कित्येक वर्षांचा वनवास संपवून प्रधानमंत्री यांच्या हस्ते परत आयोध्येला येतील. खरं तर त्यांची जीभ घसरली आहे. प्रभू श्रीरामांचा वनवास संपवण्याइतके पंतप्रधान कधी मोठे झाले? जिल्हा आयुष रुग्णालयाची शहर काँग्रेसने पोलखोल केल्यानंतर विखे पिता-पुत्रांना थेट दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली आहे. म्हणून आता पंतप्रधानांची स्तुती करून आपले पितळ झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र, ते करताना प्रभू श्रीरामांनाही त्यांनी पंतप्रधानांपेक्षा मोठे केल्याचे दुर्दैवी असल्याचे किरण काळे यांनी या वेळी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT