Arunbhai Gujrathi
Arunbhai Gujrathi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अरुणभाई गुजराथी संतापले, अशोक चव्हाणांच्या खात्यावर ३०२ दाखल का करु नये?

कैलास शिंदे

जळगाव : डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असे ज्यांच्या बाबतीत म्हटले जाते असे नेते म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी.(Arun Gujarati) पण हेच अरुणभाई संतापले आणि त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरलं. इतक्यावरचं न थांबता त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्यावर ३०२ चा गुन्हा का दाखल करु नये? असा सवालही केला.

त्याचं झालं असं अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील चोपडा शिरपुर रस्त्यावरील कलंगी पर्यंतचा रस्ता आणि शहरापासून निमगाव पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या गंभीर अपघातात मागच्या ३ महिन्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक वेळा तक्रार करुनही बांधकाम विभागाचे अधिकारी खड्डे बुजवत नसल्याने नागरिक संतप्त झाले.

यानंतर अरुणभाई गुजराथी यांच्यासह नागरिकांनी रस्त्यात ठिय्या मांडला आणि संबंधित मक्तेदार यांना ताबडतोब खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली. यावेळी अरुणभाईंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे यांना फोन करून त्यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आपण राजकारणात आहोत, पण इतके झोपलेले बांधकाम विभाग आपण यापुर्वी कधीच पाहिलेले नाही, २६ लोकांचे बळी गेल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम होत नसेल तर या खात्यावर ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये? ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही तातडीने तुमच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवा, अन्यथा आपण याच ठिकाणी बसून राहणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT