Amrish Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बिनविरोधचा मार्ग मोकळा होताच अमरिश पटेल यांची इच्छा राहिली अपूर्ण

सरकारनामा ब्युरो

धुळे : धुळे व नंदुरबार विधान परिषद निवडणूक (Legislative Council Election) बिनविरोध होणार असल्याने अमरिश पटेल (Amrish Patel) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ते सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार आहेत. पण आता थेट लढत होणार नसल्याने अमरिश पटेल यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पटेल यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले होते.

पटेल यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार गौरव वाणी (Gaurav Wani) यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या जागेवर आता थेट लढत न होता पटेल बिनविरोध निवडून जाणार आहेत. पण पटेल यांची मतदान व्हावे, अशी इच्छा होती. ते म्हणाले होते की, मी निवडणूक लढणारा माणूस आहे, त्यामुळे मतदारांची मते घेऊनच मला निवडून यायचे आहे. निवडून येण्यात जो आनंद आहे, तो कशातच नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी बिनविरोधसाठी प्रयत्नही करणार नाही.

मी गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या वाटचालीत नागरिक व कार्यकर्त्यांनी मला भरभरून पाठींबा दिला आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य असते. मी केलेली कामे जनतेपुढे आहेत. या निवडणुकीआधीच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध मतदारांनी संपर्क करून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला पाठींबा व्यक्त केला आहे. हा लोकसंपर्कच आपल्याला विजयी करील, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, धुळे-नंदुरबार व मुंबईतील भाजपची जागा बिनविरोध करण्यासाठी कोल्हापूरात भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे पटेल यांच्याविरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच भाजप व काँग्रेसच्या नेत्यांची धावाधाव सुरू होती. प्रामुख्याने सर्वच पक्षांचं लक्ष कोल्हापुरकडे लागलं होतं.

अखेर कोल्हापुरमध्ये सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी भाजपच्या मुंबई व धुळ्यातील जागा बिनविरोध करण्यावर दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे अमरिश पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक झाली असती तरी पटेल यांचा विजय निश्चित मानला जात होता. 2009 आणि 2015 मध्ये ते या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

अमरिश पटेल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात अमरिश पटेल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत भाजपची सर्व मते मिळवतानाच त्यांनी महाविकास आघाडीची मतेही मोठ्या प्रमाणात खेचली.

राजकीय वाटचाल अशी

अमरिशभाई पटेल यांनी १९८५ मध्ये शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणाला सुरवात केली. १२ वर्षे ते नगराध्यक्ष होते. १९९०, १९९५, १९९९ व २००४ अशा सलग चार निवडणुकीत ते काँग्रेसकडून शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. २००३-०४ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT