Maharashtra Politics : नाशिकमधला भोंदू ज्योतिषी अशोक खरात हा महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण कॅप्टन खरातविरोधात आणखी ३ महिलांच्या शोषणाच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच माध्यमांशी बोलताना मिरगावच्या ग्रामस्थांनीही त्याच्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या.
भोंदू ज्योतिषी अशोक खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टचा अध्यक्ष आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता मिरगावातील ग्रामस्थ संतापले आहे. मिरगावातील ग्रामस्थांमध्ये गावाची बदनामी झाल्याची भावना असून या भोंदू बाबाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना तेथील ग्रामस्थांनी खरातवर अतिक्रमणासह गावचा निधी पळविल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत येत्या काही दिवसांत ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ग्रामसभा घेऊन खरात याला गावबंदी करण्यात यावी तसेच त्याने गावात उभारलेल्या ईशानेश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्यात यावा अशी मागणी काही ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
अशोक खरात हा मूळचा सिन्नर तालुक्यातील कहांडळंवाडी येथील रहिवासी आहे. त्याने २००८ - ०९ मध्ये मिरगाव येथे जामनदीच्या काठावर जमीन विकत घेऊन ईशान्येश्वर मंदिर उभारले होते. या मंदिराच्या अवतीभोवती त्याने सुमारे ४० ते ५० एकर जमीन विकत घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मंदिराच्या पाठीमागे अलिशान अशा बंगल्याची उभारणी केली आहे. ज्याची किंमत देखील कोट्यावधी रुपयांमध्ये असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Nashik News)
अशोक खरात विरोधात मिरगाव येथील शेतकरी भागवत शेळके यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. भागवत शेळके यांच्या शेतात आणि वस्तीकडे जाण्यासाठी असलेला पारंपरिक वहिवाटीचा रस्ता अशोक खरात याने मंदिरासाठी बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शेळके कुटुंबाचा त्यांच्या स्वतःच्या शेत आणि घराशी संपर्क तुटला. परिणामी, त्यांना वस्तीकडील घर सोडून गावातच एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
येथील हिंगे वस्तीसाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी ईशान्येश्वर मंदिराजवळ उभारल्याने त्या भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच गावात कोणीही जमीन विक्रीस काढली, तर कॅप्टन खरात ती वाढीव दराने स्वतःच खरेदी करीत. त्यामुळे स्थानिकांना हक्क असूनही जमीन घेता आल्या नाहीत असे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे मिरगावातील ग्रामस्थ पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.