Bachchu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu And Raghunath Patil : आमदार कडू, रघुनाथदादांसह 19 जणांविरोधात दोषारोप निश्चिती

Pradeep Pendhare

Ahmednagar News : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्याविरोधात श्रीरामपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले.

आंदोलनात या दोघांसह 19 जणांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्यात ही न्यायालयीन कार्यवाही झाली. त्यामुळं आमदार कडू आणि रघुनाथदादांसह सर्व 19 जण न्यायालयात हजर होते. पुढची सुनावणी 15 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती वकील बाबासाहेब मुठे यांनी दिली.

श्रीरामपूरमधील मुठेवडगाव येथील शेती आणि पाणी प्रश्नावर एप्रिल 2017 मध्ये शेतकरी (Farmer) संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाने पाटबंधारे कार्यालयात आसूड आंदोलन केले होते. आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला आणि अधिकाऱ्यांना काळे फासले होते. यामुळे हे आंदोलन चांगलेच गाजले.

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्यासह कालिदास आपेट, अजय महाराज बारस्कर, बाळासाहेब पठारे, अनिल औताडे, युवराज जगताप, भीकचंद मुठे, डॉ. शंकर मुठे, रुपेश काले, रमेश मुठे, रघुनाथ मुठे, भाऊसाहेब मुठे, शिवाजी मुठे, संजय गवारे, चांगदेव मुठे, पाराजी शिंदे, भास्कर शिंदे, विलास कदम या प्रमुख आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटबंधारे कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण फिर्याद आहेत. या आंदोलनात पूर्वीच जामीन मंजूर झाला होता. श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन आंदोलकांविरुद्ध काल शुक्रवारी दोषारोप निश्चित करण्यात आले. आमदार कडू आणि रघुनाथदादा पाटील यावेळी उपस्थित होते. आमदार कडू न्यायालयाचे कामकाज उरकल्यानंतर रवाना झाले, तर रघुनाथदादांनी सरकारी विश्रामगृहावर थांबून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषगांने चर्चा केली.

स्थानिक नेते गप्प, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव्य

दरम्यान, या खटल्यानिमित्ताने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. श्रीरामपूरमधील पाटपाण्याच्या प्रश्नावर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामधून नेते येऊन आंदोलन करतात. मात्र स्थानिक नेते बोलत नाही, हे दुर्दैव्य आहे. सन 2012 पासून शेतकरी संघटनेने पाटपाण्याच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत, असे अनिल औताडे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT