Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने फुंकला विधानसभेचा बिगुल, मतदार साथ देतील का?

Sampat Devgire

Congress News: काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचा बिगुल नंदुरबार येथून फुंकला. नंदुरबारसह खानदेश सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसने टाकलेले हे पाऊल कितपत यशस्वी होईल, हा चर्चेचा विषय आहे.

नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांसह विविध प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात उणीव जाणवत होती ती आत्मविश्वास असलेल्या कार्यकर्त्यांची. त्यामुळे खानदेशमध्ये मोठ्या अपेक्षेने काँग्रेसने घेतलेल्या या कार्यक्रमातून पक्षाला काय साध्य होईल हा चर्चेचा विषय आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित कार्यकर्त्यांपुढे महायुती सरकारच्या घोटाळ्यांची मालिका मांडत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट आहे. ५० खोके एकदम ओके, हे अद्यापही जनता विसरलेली नाही.

सध्या मंत्रालय हे टक्केवारीचे केंद्र बनले आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेत होते. राज्यातील महायुतीचे सरकार त्याही पुढे गेले आहे. सध्या सरकारमध्ये फक्त पैसे कमविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे.

शासनाच्या अनेक विभागांच्या कर्मचाऱ्यांना चार- चार महिने पगार होत नाही. लाडकी बहीण योजनेवर सरकारने ४०० कोटींची उधळपट्टी केवळ प्रसिद्धीसाठी केली आहे. प्रत्यक्षात या बहिणींना हे अनुदान मिळविण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे.

या भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून फेकून द्यावे लागेल. ते काम काँग्रेस पक्षाला करावे लागेल. ही सुरुवात आपण खान्देशमधून करू या.

यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी देखील थोरात यांना साथ दिली. खानदेशच्या जनतेने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. खानदेशच्या जनतेच्या रक्तातच काँग्रेस आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी या नेत्या काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ नंदुरबार येथून करत असत.

प्रत्येक मतदारसंघात आज काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला मोठे पाठबळ आम्ही खानदेशातून देऊ, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

नंदुरबार हे भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे कार्यक्षेत्र आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती एवढेच काय विधानसभेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा बोलबाला आहे. अतिशय सक्षम यंत्रणा भाजपने निर्माण केली आहे.

भाजपच्या यंत्रणेवर सर्व नेत्यांचे बारीक लक्ष असते. असे असताना संघटनेचा कुठलाही भक्कम आधार नसताना काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. या तयारीला किती प्रतिसाद मिळेल, हा चर्चेचा विषय आहे.

खुद्द कार्यकर्त्यांमध्ये देखील विधानसभेत काय होईल? याची अस्वस्थता जाणवते. त्यामुळे खरोखर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खानदेशातून काँग्रेसला मोठे पाठबळ मिळेल का? हा चर्चेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT