Dhule Congress Meting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bapu Chaure Politics: डी. एस. अहिरेंचा तोल सुटला, निरीक्षकांपुढेच काँग्रेसचे दोन गटांत धुमशचक्री!

Sampat Devgire

Congress News: विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. याची प्रचिती राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या बैठकीत येत आहे. साक्री शहर काँग्रेस बैठकीत इच्छुकांचे दोन घट परस्परांतच भिडल्याने हा वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच झाली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे निरीक्षक आमदार काझी मोहम्मद यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते.

साक्री मतदारसंघासाठी माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीव मनीष आणि माजी खासदार डी. एस. अहिरे यांचे चिरंजीव धीरज हे दोघे प्रबळ इच्छुक आहेत. त्यामुळे या इच्छुकांमध्ये सातत्याने वादाची ठिणगी पडत असते.

या बैठकीत माजी खासदार अहिरे यांना भाषण करताना राग आणावंर झाला. त्यांनी थेट माजी खासदार चौरे आणि त्यांच्या पाठीराख्यांवर भारतीय जनता पक्षाचे हस्तक असल्याचा आरोप केला. यावेळी ते अपशब्द उच्चारत होते. त्यामुळे पदाधिकारी देखील अस्वस्थ झाले.

या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहिरे यांच्या ऐवजी माजी खासदार बापू चौरे तसेच योगेश भोले, वसंत सूर्यवंशी यांनी भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी अपक्ष उमेदवार मंजुळाताई गावित यांचा प्रचार केला होता.

त्यावरून माजी खासदार अहिरे असभ्य भाषेत सुनावत असल्याने व्यासपीठावर बसलेले चौरे यांचे समर्थक दर्यावगीर महंत चांगलेच संतापले. त्यावरून अहिरे आणि चौरे समर्थकांत निरीक्षकांसमोरच गुद्दा गुद्दीची वेळ आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शाम सनेर आणि सहकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

या वादाला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची किनार होती. त्यावेळी माजी खासदार अहिरे यांनी देखील भारतीय जनता पक्षाची सख्य केले होते, अशी तक्रार आहे. भाजपशी निकटता असल्यानेच काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी मोठी नाराजी होती. ही नाराजी विधानसभेच्या निवडणुकीत प्रकट झाली. त्यात आहिरे यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून या दोन्ही गटांना एकत्र केले होते. तडजोड म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बापू चौरे यांचे चिरंजीव मनीष आणि अहिरे यांचे चिरंजीव धीरज यांना उमेदवारी देण्यात आली होती.

यामध्ये अहिरे यांचे चिरंजीव विजयी झाले. मात्र चौरे पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांनी पक्षासाठी काम केले होते. मात्र आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला? यावरून हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

बहुतांशी पदाधिकारी श्री चौरे यांच्याविषयी सहानुभूती असणारे आहेत. श्री चौरे यांना जनमानसात देखील चांगले स्थान असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारीसाठी आपल्याला डावलले जाईल, याचा अहिरे यांचा राग असावा. त्यातूनच थेट पक्ष निरीक्षकांसमोरच ही अप्रिय घटना आणि गटबाजीचे प्रदर्शन घडले.

या बैठकीला उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा शिंदे, जिल्हा अध्यक्ष सनेर, शहराध्यक्ष डॉ अनिल भामरे, रमेश श्रीखंडे, माजी नगरसेवक साबीर शेख, गायत्री जयस्वाल, भा.ई. नगराळे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते

विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. मात्र परंपरेप्रमाणेच काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. नेत्यांनी एकमेकांचा उद्धार केला. कपडे फाटण्याची वेळ आली होती, मात्र वरिष्ठांनी वेळीच सावरले. आता प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यावर या नेत्यांचे मनोमिलन होते की, पुन्हा एकदा पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला हा वाद कारण ठरतो याची उत्सुकता आहे.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT