Shirdi Lok Sabha Politics : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात आता गंभीर आरोप समोर येऊ लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांनी वाकचौरे यांच्या पक्षांतरामागे मुंबई मेट्रो प्रकल्पातील 100 कोटी रुपयांहून अधिकच्या टेंडरचा संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
दरम्यान, पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरे सुरू केले असून, 29 जून रोजी ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच शिर्डीच्या राजकारणात नवा वाद उभा राहिला आहे.
वंचितच्या (VBA) उत्कर्षा रूपवते यांनी गेल्या काही दिवसांत शिर्डी मतदारसंघात आक्रमक भूमिका घेत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर थेट हल्लाबोल सुरू केला आहे. त्यांनी आरोप केला की, वाकचौरे यांनी मतदारांचा विश्वासघात केला, असून 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी बहुतांश आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये स्वतः शिर्डी (Shirdi) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील नेत्यांना आधीच, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विश्वास ठेवू नका, असा इशारा दिला होता. तरीही उमेदवारी देण्यात आली. रूपवते यांनी वाकचौरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, सात वेळा पक्ष बदलणाऱ्या खासदारांनी विकासाची आश्वासने देण्यापेक्षा पुन्हा पक्षांतर करणार नाही, हे वचन जनतेला द्यायला हवे होते.
उद्धव ठाकरे यांच्या आगामी शिर्डी दौऱ्यावर बोलताना त्यांनी दावा केला की, वाकचौरे निवडून आले तरी ते कधीच तुमचे होणार नाहीत, हे मी आणि स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना आधीच सांगितले होते. त्यामुळे आता मतदारसंघात जाऊन काहीही फायदा होणार नाही.
सर्वात मोठा आरोप करताना उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, खासदार वाकचौरे यांच्या मुलाला मुंबई मेट्रो प्रकल्पात 100 कोटींहून अधिकचे टेंडर मिळाल्याची चर्चा सुरू आहे. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी पक्षांतर केले असून जनता त्यांना याचा जाब विचारेल. याचवेळी त्यांनी आणखी टीका करत म्हटले की, आज वाकचौरे यांना मतदारांमध्ये संरक्षण घेऊन फिरावं लागतं. जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते पुन्हा निवडून येणार नाहीत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा संदर्भ देत रूपवते म्हणाल्या की, दहा वर्ष खासदार राहूनही आज त्यांची अवस्था हतबल झाल्यासारखी आहे. वाकचौरे यांनी तात्काळ राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी. शेवटी निधीअभावी विकासकामे झाली नाहीत, या कारणावरून जबाबदारी झटकणाऱ्या वाकचौरे यांच्यावर टीका करत रूपवते यांनी, विरोधी पक्षातील इतर खासदार विकासकामे करत नाहीत का? कितीही सुरक्षा घेऊन फिरा, पण जनता प्रश्न विचारणारच, असे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.