Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंच्या पराभवासाठी भाजपला हवीत फक्त तीन मते : महाजन लागलेत कामाला...

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या भाजपचे (BJP) नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. मात्र आता त्याची खऱ्या अर्थाने कसोटी मुंबईच्या विधानपरिषदेच्या मैदानात दिसून येणार आहे. खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व महाजनांकडे आले. भाजपतील जिल्ह्यातील निर्णय त्यांच्या माध्यमातूनच होत असतात. (Eknath Khadse | Girish Mahajan Latest News)

जळगाव महापालिका निवडणुकीत महाजनांच्याच नेतृत्वात पक्षाने झेंडा फडकविला होता. मात्र कालातंराने भाजपमध्ये फुट पडली आणि त्यांची सत्ता गेली. जिल्हा बँक निवडणुकीतही गिरीश महाजन यांनी बहिष्कार टाकून भाजपचे उमेदवार संचालकपदासाठी माघार घेण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आमने सामने येणार आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहेच. पण आता त्या अगोदर मुंबईतील विधानपरिषद निवडणूकीच्या मैदानात ही लढत होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून मैदानात उतरविले आहे. ही निवडणूक बिनविरोध न करता भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतरवून ही निवडणूक अटीतटीची केली आहे. यात पाचव्या उमेदवारासाठी खरी लढत कॉंग्रेस व भाजपत असली तरी भाजपाचा खरा निशाना एकनाथराव खडसे हेच असल्याचे सांगितले जात आहे. (Eknath Khadse | Girish Mahajan Latest News)

विधानपरिषद निवडणुकीत सध्या विजयी मतांचा कोटा २६ वर आला आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या मताचा कोटा पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे खडसे यांना निवडून येण्यासाठी केवळ तीन मताची अधिक आवश्‍यकता आहे. शिवसेनेकडे अतिरिकत मते आहेत. ती मते मिळाल्यास त्यांचा विजय अवघड नाही, शिवाय खडसे यांचे इतक्या वर्षाची राजकीय कारकिर्द पाहता त्यांचे भाजपसह सर्वच पक्षात सौदार्हाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यातूनही काही मते त्यांना मिळू शकतात.

परंतु भाजपने गुप्तमतदान पध्दतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतात फुट पाडून ही मते आपल्या पदरात पाडून घेतल्यास खडसे यांचा घात होवू शकतो असेही सांगितले जात आहे. खडसे यांचा पराभव हाच भाजपचा रणनितीचा मोठा विजय असणार आहे. राज्यसभा निवडणूकीत संजय पवार टार्गेट ठेवून भाजपने खरा निशाणा संजय राऊत यांच्यावर लावला होता. मात्र ते थोडक्यात बचावले अगदी असाच सापळा खडसे यांच्यासाठी लावण्यात येवू शकतो. त्यामुळेच भाजपचे अनिल बोंडे म्हणाले, ‘भाई’ किंवा ‘भाऊ’ कोणीही एक पराभूत होवू शकतो. (Eknath Khadse | Girish Mahajan Latest News)

भाजपने या रणनितीसाठी ज्या तीन जणावर जबाबदारी सोपविली आहे. त्यात गिरीश महाजन यांचाही सामावेश आहे. राज्यसभा निवडणुकीतही महाजन यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. आता विधानपरिषदेही आपण यश मिळविणारच अशी घोषणा त्यांनी केली आहे. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. फडणवीस यांचे विश्‍वासू महाजन आहेत. त्यातच खडसे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व महाजनांनाही नको आहे. आगामी काळात भाजपला खडसे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजप आणि महाजन खडसे यांना पराभूत करण्यासाठी खेळी आखतील हे निश्‍चित आहे.

मात्र या खेळीत खडसे अडकणार का? भाजप त्यांना पराभूत करणार का? कि महाविकास आघाडीचे बळ आणि ४५ वर्षाचा राजकीय अनुभव या ताकदीवर खडसे आपला विजय संपादन करतात हेच २० तारखेच्या निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळेच जळगावच्या नेतृत्वाची लढाई सध्या तरी मुंबईच्या मैदानात दिसून येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT