Rahul Gandhi vote theft criticism : व्होट चोरीच्या मुद्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर हल्ला चढवत आहे. बिहारच्या निवडणुकीत देखील हा मुद्दा तापला आहे. केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोग या आरोपांनी बेजार आहे.
या व्होट चोरीच्या आरोपात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शिर्डी विधानसभा मतदारसंघांचा संदर्भ दिला. यावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या व्होट चोरीच्या मुद्यावर मंत्री विखे पाटलांनी राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं आहे.
मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या व्होट चोरीच्या मुद्यावर बोलताना, फक्त नौटंकी सुरू असून, हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेल्या पक्षाची प्रतिमा सांभाळावी, असा सल्ला दिला आहे. ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतक्या दिवस काय करीत होते? असा सवाल देखील मंत्री विखे पाटील यांनी केला आहे.
राहुल गांधी व्होट चोरीच्या मुद्यावरून सातत्याने निवडणूक आयोगावर (Election Commission) आरोप करत आहेत. आयोगाने त्यांना यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. ते का देत नाहीत? फक्त मुक्ताफळ उधळण्याचे काम त्यांची सुरू आहेत. मतदार याद्यांची काही प्रक्रिया असते, उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अशा प्रकारामुळेच काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालल्याचे घणाघात मंत्री विखे पाटील यांनी केला.
मंत्री विखे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावर देखील भाष्य केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. परंतु खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत, तशा सूचना क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आल्यावर, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.
कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे सांगून बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचे लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील, ही सरकारची भूमिका आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांची सुध्दा तीच मागणी असल्याकडे लक्ष वेधताना, मराठा समाजाच्या संघटनानी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू, असेही मंत्री विखे पाटलांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना मंत्री विखे यांनी सांगितले की, त्यांचे दिल्लीत जाणे हे मराठा अधिवेशनाच्या निमित्ताने असावे. अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी आहेत. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कर्नाटक सरकारने परस्पर पावलं उचलल्यास राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल, अशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.