Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : शरद पवारांचे एक वाक्य झोंबले, मंत्री विखेंचे जशास-तसे प्रत्युत्तर...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेविषयी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरातांकडे चिंता व्यक्त केली होती. शरद पवार यांची प्रतिक्रिया भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना चांगलीच झोंबली. त्यांनी देखील शरद पवार यांना जशास-तसे प्रत्युत्तर दिले.

"नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची शरद पवार यांनी चिंता करू नये. राज्यातील सहकार क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात आल्याची खंत त्यांना असावी", अशी टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

शरद पवार, बाळासाहेब थोरात मुंबईमध्ये (कै.) उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेविषयी बाळासाहेब थोरातांकडे चिंता व्यक्त केली होती. "बाळासाहेब, मला नगर जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागलीय, असे म्हणत, आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत, त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजतंय ते सगळ्यांना माहिती आहे", असा टोला शरद पवार यांनी भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चिंतेवर मंत्री विखेंनी जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. "शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची चिंता करू नये. आमची देखील चिंता करू नये. नगर जिल्ह्यातील सहकारी संस्था चालवण्यासाठी जिल्ह्यातील नेतृत्व समर्थ आहे. राज्यातील सहकार क्षेत्र शरद पवारांनी स्वतः आपल्याच भोवती ठेवले होते. त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्याची खंत त्यांना वाटत असावी", असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा घेतला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विनायक देशमुख, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद सीईओ अशीष येरेकर उपस्थित होते.

मंत्री विखेंचा थोरातांवर निशाणा

मंत्री विखे यांनी काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधताना ते शेतकरीविरोधी होते, असा टोला लगावला. खंडकरी शेतकऱ्यांना पूर्वी 50 टक्के नजराण भरावा लागत होता. तो आता सरकारने पूर्ण माफ केलाय. अकारी शेतकऱ्यांच्या जमीन परत मिळवण्याचा लढा 70 वर्षे सुरू होता. या जमिनी परत करता येणार नाही, असी भूमिक त्यावेळेच्या सरकारने न्यायालयात घेतली होती. मात्र आम्ही पाठपुरावा करून या जमिनी शेतकऱ्यांना मिळून दिल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या जमिनीमुळे शेतकऱ्यांना परत करण्याचा आदेश दिला. पूर्वीचे महसूलमंत्री शेतकरी विरोधी होते, असा टोला मंत्री विखे यांनी थोरातांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT