Radhakrishna Vikhe Ramgiri Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचे विधान, मंत्री विखेंचा राजकारण करणाऱ्यांना इशारा...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : सरला बेटावरील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानामुळे आणि नाशिक बंदमधील हिंसक प्रकाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तणावपूर्व शांतता आहे. राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, राजकीय नेत्यांमध्ये यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.

भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे यांनी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर राजकारण करणाऱ्यांना फटकारले आहे. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात जो उद्रेक झालाय, त्यावर जिल्हा प्रशासनाची बारकाईने नजर आहे. गुन्हा देखील झाला आहे. परंतु त्या आडून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु समाजात वाद उद्भवेल, असे वक्तव्य टाळले पाहिजे, असे मंत्री विखे यांनी म्हटले. दरम्यान, रामगिरी महाराज यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी अहमदनगर शहरात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 47 मुस्लिमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची भेट घेतली. त्यावर देखील मंत्री विखे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. ती राजकीय भेट नव्हती. मुख्यमंत्री शिंदे रामगिरी यांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केले आहे. गंगागिरी महाराजांची गादी पवित्र आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते, असे विखे यांनी सांगितले.

शिंदे, फडणवीस, पवार शिर्डीला येणार

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत 22 ऑगस्टला मेळावा होत असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित शिर्डीत मेळावा होणार आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिर्डी एमआयडीसीची भूमिपूजन, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. अकोले तहसील कार्यालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीतून होईल, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी विधान केले होते. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. साहेबान अन्सार जहागीरदार (रा. बेलदार गल्ली, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा पुढे एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाणे (जि. नाशिक) येथे वर्ग करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT