Shrirampur News : ‘ड्रग्स फ्री श्रीरामपूर’ अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या नशामुक्ती जनजागृती रॅलीत हजारो विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहर दुमदुमले. मात्र, रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचताच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आणि चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे अचानक भीषण वाहतूक कोंडी झाली.
मोठा पोलिस बंदोबस्त असूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणाची सूत्रे हाती घेतली. तब्बल पाऊण तास चौकात उभे राहून त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
शुक्रवारी सकाळी श्रीरामपूरच्या (Shrirampur) बोरावके महाविद्यालयाच्या क्रीडांगणातून ‘ड्रग्स फ्री श्रीरामपूर’ अभियानांतर्गत जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. नेवासे रस्त्याने महात्मा गांधी पुतळ्याजवळ आलेल्या या रॅलीत पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार हेमंत ओगले, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे तसेच विविध राजकीय व प्रशासकीय पदाधिकारी सहभागी झाले होते.
रॅली मुख्य रस्त्याने दत्तभुवनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर परिस्थिती बदलली. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आणि चौकात चारही दिशांनी आलेली वाहने यामुळे काही वेळातच वाहतुकीची कोंडी झाली. पोलिस यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पालकमंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) रॅलीतून बाजूला झाले आणि स्वतः चौकात उभे राहिले.
वाहनांना एकेक करून मार्ग मोकळा करून देणे आणि रॅलीतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे, अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही मिनिटांचा हा हस्तक्षेप नव्हता; तब्बल पाऊण तास पालकमंत्री चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.
या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यापेक्षा वाहतूक पूर्ववत करण्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. पालकमंत्रीच थेट रस्त्यावर उतरल्याने पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणाही अधिक सक्रिय झाली. अखेर वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतरच विखे पाटील यांनी चौक सोडला.
त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन चौकात पोहोचल्यानंतर त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला; मात्र शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री विखे पाटील यांनी तब्बल पाऊण तास रस्त्यावर उभे राहून केलेल्या वाहतूक नियंत्रणाची शहरात विशेष चर्चा रंगली.
वाहतूक नियंत्रण सुरू असतानाच काही नागरिकांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली. नगरसेवक दाम्पत्य दीपक चव्हाण आणि वैशाली चव्हाण यांनी आदिवासी जन्मदाखल्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. या प्रश्नाची तत्काळ दखल घेत विखे पाटील यांनी उपस्थित प्रांताधिकारी किरण सावंत आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांना प्रकरणात जातीने लक्ष घालून प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, एका महिलेनेही आपली समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडली. या प्रकरणाची दखल घेत त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांमार्फत योग्य तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे एका बाजूला वाहतूक कोंडी सोडविण्याची धावपळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश दिले जात असल्याचे चित्र दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.