Chandrakant Patil, Uddhav Thackeray
Chandrakant Patil, Uddhav Thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांसाठी धावले चंद्रकांत पाटील ; मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar)यांच्यानंतर आता मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST employees) नागरिकांना नाईलाजाने वेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागतोय आणि नाहक जीव गमवावा लागतोय म्हणून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला होता. दोन दिवसात संप मागे घ्या अन्यथा आपण स्वत: एसटी चालवणार असल्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला होता, त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती, पण आता ते त्यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, यासाठी चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र धाडले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून नियमाधीन कार्यवाही करावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमधील आमदाराने मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

तीन दिवसापूर्वी शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र लिहिल्याने आश्चर्य करण्यात आले. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हे पत्र जनभावनेच्या दृष्टीने योग्यच असल्याचे सांगत आमदार बांगर यांची स्तुती केली होती. त्यामुळे यावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यानंतर बांगर यांनी आता स्पष्टीकरण देत हे पत्र आपण लिहिलं नसल्याचे धुमजाव केले.

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या ७० दिवसांपासून संपावर गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आजवर ७७ कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत. न्यायालयीन लढा जोवर संपत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. या वर तोडगा म्हणून आता महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कंत्राटी चालक सरकार नेमणार असून 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती होणार आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कृती समितीच्या सदस्यांची नुकतीच बैठक झाली आहे. संप मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हा संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून दोन महिने झाले आहेत. पण विलीनीकरणाच्या मागणीबाबत सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. त्यात निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई केली जात आहे. अशात पगार बंद असल्याने कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पगार मिळत नसल्याने घर खर्चासाठी पैसे आणायचे कुठून, मुलांचे शिक्षण पूर्ण कसं करायचं या सगळ्या अडचणीत सापडलेले कर्मचारी आता कामावर हजर होतांना पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT