Chhagan Bhujbal & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : निर्दोष असताना अडीच वर्ष भुजबळांना तुरुंगात काढावी लागली, 'माफी मागा'.. संजय राऊतांचा हल्लाबोल कुणावर?

Sanjay Raut On Chhagan Bhujbal Case : महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांना दोषमुक्त केलं आहे. भुजबळ यांच्या मुक्ततेनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) विशेष न्यायालयानेही त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे निर्दोष असतानाही भुजबळांना २ वर्ष तुरुंगात राहावे लागले. याला जबाबदार कोण अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप, ईडी व महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला निशाण्यावर घेतलं आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. म्हणाले, देशातील एकमेव अशी ही खोटी आणि बनावट केस होती. ज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्याला जाणीवपूर्वक अडकवून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आणि तब्बल अडीच वर्षे तुरुंगात डांबून ठेवले.

याप्रकरणी छगन भुजबळ हे सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा करत होते. आपण कोणत्याही गैरव्यवहारात सहभागी नाही असं ते ओरडून सांगत होते. तरीही तब्बल अडीच वर्षे त्यांना तुरुंगात ठेवलं गेलं. त्या काळातील यातना, मानसिक त्रास आणि सामाजिक बदनामी याची भरपाई आता कोण करणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

याप्रकरणावरुन राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केला आहे. राऊत म्हणाले, याप्रकरणात भाजपने दुट्टपी भूमिका घेतली. भाजपनेच छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केली, त्यांना चक्की पिसायला जेलमध्ये पाठवले आणि त्यानंतर त्याच भाजपने त्यांना मंत्री केले. आणि आता ईडीनेही भुजबळ हे निर्दोष असल्याचं जाहीर केलं आहे.

निर्दोष असतानाही भुजबळ यांच्या आयुष्यातील तब्बल अडीच वर्षे तुरुंगात गेली. या काळात त्यांना प्रंचड त्रास सहन करावा लागला. अपमान, वेदना सहन करावी लागली. या सगळ्याची भरपाई आता कोण देणार? भाजप देणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरपाई देणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पार्टी सगळ्यात ढोंगी आणि खोटी पार्टी आहे. सत्ता टिकवण्यासाठी राजकीय सूडबुद्धीने भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. या प्रकरणातून भाजपची खरी मानसिकता देशासमोर उघड झाली असून ईडी आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने छगन भुजबळ यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. निर्दोष व्यक्तीला वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवणं हा अन्याय असून, त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT