Chhagan Bhujbal News, Yeola News, Nashik News
Chhagan Bhujbal News, Yeola News, Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सत्ता गेली तरी छगन भुजबळांवर येवलेकरांचे प्रेम कायम!

Sampat Devgire

येवला : सत्ता असली काय आणि नसली काय? येवलेकरांचे (Yeola) प्रेम आमच्यावर नेहमी आहे, हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली, तरी विकास मी कधीही थांबू देणार नाही. राज्यात कितीही सत्तांतर झाले, तरी मतदारसंघ मजबूतीने उभा राहील, हे आपण सर्व दाखवून देऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (Chhagan Bhujbal visits Own constituency Yeola after new government)

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.(Chhagan Bhujbal News in Marathi)

येथील राधाकृष्ण लॉन्समध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.(Nashik Latest Marathi News)

श्री. भुजबळ म्हणाले, की शरद पवार यांच्या विचारांचे राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार गेले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ते चार चक्रीवादळ आली. नैसर्गिक आपत्तीतून लोक सावरत असताना, राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले. अनेक संकटांचा सामना करत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांचा जीव वाचविण्यासोबतच अनेक विकासकामे राज्यात केली. जिल्ह्यात ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, त्यांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

मी लोकप्रतिनिधींना समप्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये, म्हणून मी ऑनलाईन बैठका घेतल्या आणि जनतेची कामे थांबू नयेत, असे आदेश दिले होते. आता केवळ जिल्ह्यातील नाही, तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती दिली आहे. आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे झाले.

कांद्याला अल्प भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. घरगुती सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे खते व बियाणांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ‘कहा धुंडे सबका साथ, सबका विकास, कोई बता नही रहा, कब होगी महेंगाई पर मात’ या शायरीद्वारे त्यांनी सरकारवर टीका केली.

ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जयदत्त होळकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, मोहन शेलार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, बाबासाहेब देशमुख, अकबर शहा, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, माजी सरपंच प्रसाद पाटील, साहेबराव आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, राजेश शेख, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, शफीक शेख, बाळासाहेब गुंड, सचिन कळमकर, प्रवीण बनकर, राजश्री पहिलवान, अशोक नागरे, मकरंद सोनवणे, शिवाजी सुपनर, भाऊसाहेब धनवटे, सचिन दरेकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, विजय जेजुरकर आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT